वार्ताहर/ सांबरा
तालुक्याच्या पूर्व भागामध्ये भात कापणीची एकच धांदल उडाली असून शेतकरीवर्ग सुगीच्या कामाध्ये मग्न झाल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.
पुर्व भागामध्ये गेल्या दहा दिवसापासून पावसोन विश्रांती घेतली आहे. पण ढगाळ वातावरणामुळे कोणीही भात कापणीचे धैर्य केले नव्हते. गेल्या चार दिवसांपासून काही शेतकऱयांनी धाडस करून भात कापणीला प्रारंभ केला असून आता त्यापाठोपाठ मंगळवारपासून सर्वच शेतकऱयांनी भात कापणीला जोरदार प्रारंभ केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून वातावरण पूर्णपणे निवळले असून स्वच्छ सुर्य प्रकाश पडत आहे. त्यामुळे भातकापणीच एकच धांदल उडाली आहे.
पुर्व भागातील बसवण कुडची, निलजी, मुतगा, सांबरा, बाळेकुंद्री खुर्द, होन्नीहाळ, बसरीकट्टी, मोदगासह कणबर्गी, कलखांब, चंदगड अष्टे, मुचंडी आदी भागात भात कापणीला प्रारंभ करण्यात आला आहे.
मजुरांचा तुटवडा
पुर्व भागामध्ये भात कापणीला एकाचवेळी प्रारंभ करण्यात आल्याने शेतकऱयांना मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे मजुरांचा भाव वधारला आहे. काही शेतकऱयांनी परगावाहून मजुर आणून भात कापणीची कामे उरकून घेत आहेत. पुढील पंधरा दिवस तरी भात कापणीची कामे सुरु राहाण्याचा अंदाज शेतकऱयांतून व्यक्त केला जात आहे. या भागातील भातकापणीची कामे लवकर आटोपली तरी मळणी कामांना विलंब होणार आहे.
अजुन शिवारामध्ये पाणी साचले असून जमिनीमध्ये मोठा् प्रमाणावर ओलावा आहे. त्यामुळे लवकर गाडेमार्ग (शेतकवडीतील रस्ते) होणार नसल्याने या कारणामुळे मळण्यांना विलंब होणार आहे.