ऑनलाईन टीम / मुंबई :
निसर्ग चक्रीवादळ अलिबागकडून 50 किमी दक्षिणेकडे सरकले होते. त्यामुळे मुंबईचा धोका कमी झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, या वादळाची लँडफॉल होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुढील एक तासात हे वादळ मुंबईत धडकणार आहे. कुलाबा वेधशाळेचेउपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी याबाबतची माहिती दिली.
दुपारी सव्वाच्या सुमारास निसर्ग चक्रीवादळाने अलिबागला धडक दिली. त्यानंतर ताशी 100 ते 120 किमीच्या वेगाने ते दक्षिणेकडे म्हणजेच मुरुडच्या बाजूने सरकले. त्यामुळे मुंबईवरील धोका काहीसा कमी झाला होता. मात्र, वादळाची लॅन्डफॉल होण्यास सुरुवात झाली आहे. ही प्रक्रिया 3 तासांची असेल. रायगड पार करून मुंबई आणि ठाण्याच्या भागाकडे हे वादळ सरकत जाईल.
दरम्यान, जोराचा वारा आणि पाऊस असल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे रस्त्यावरील चारचाकी वाहनांचेही नुकसान झाले आहे. अनेक घरांवरील पत्रे उडाले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव राज्यात NDRF च्या 21 तुकड्या तैनात करण्यात आल्या असून, 1 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.