तिरवडे, वराड, तळगाव, नांदोस, कट्टा, पेंडूर, सुकळवाडच्या सरपंचांचा सहभाग
- अधिकाऱयांसमवेत काम करीत असताना येणाऱया अडचणींवर चर्चा
- तलाठी, मंडल निरिक्षक, ग्रामसेवकांच्या कामाबाबत नाराजी
- सेवा हमी कायदा, नागरिकांची सनद यावर प्रदीर्घ चर्चा
प्रतिनिधी / सिंधुदुर्ग:
ग्रामपंचायत कार्यालयात काम करताना येणारे बरे-वाईट अनुभव, ग्रामसेवक, मंडल अधिकारी, तलाठी व कृषी अधिकारी यांच्यासमवेत काम करीत असताना येणाऱया अडचणी त्याचप्रमाणे सेवा हमी कायदा व नागरिकांची सनद यावर प्रदीर्घ चर्चा करण्याच्या उद्देशाने तिरवडे, वराड, तळगाव, नांदोस, कट्टा, पेंडूर, सुकळवाड या सात महसुली गाव सरपंचांची पहिली परिषद नुकतीच तिरवडे येथे झाली. गावच्या विकासासाठी सरपंचांनी स्वयंस्फूर्तीतून बोलावलेली ही जिल्हय़ातील पहिली सरपंच परिषद ठरली. तिरवडय़ाचे सरपंच विहंग गावडे यांनी या परिषदेचे नेतृत्व केले.
तिरवडे येथील आर्यानगरी येथे ही बैठक झाली. या बैठकीस उपस्थित सरपंचांनी सर्वप्रथम आपल्या गावाविषयी सामाजिक, भौगोलिक आणि आर्थिक परिस्थितीची माहिती सांगितली. त्याचप्रमाणे शासकीय कामे व योजना राबवत असताना येणारे चांगले व वाईट अनुभव कथन केले. यावेळी ग्रामसेवक, मंडल अधिकारी, तलाठी व कृषी अधिकारी यांच्यासमवेत काम करीत असताना येणाऱया अडचणींबाबतीत या बैठकीत प्रदीर्घ चर्चा झाली. ग्रामसेवकांकडून ग्रामसभेत घेतलेल्या ठरावांची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याची तक्रार उपस्थित सर्वच सरपंचांनी केली. शासनाकडून येणाऱया निरनिराळय़ा योजनांबाबत योग्य माहिती सरपंच व सदस्यांना दिली जात नसल्याच्या तक्रारीही मांडण्यात आल्या. वैयक्तिक लाभाच्या योजनांबाबत परिपूर्ण माहिती न देणे तसेच काही योजना राबवत असताना ग्रामस्थांना कागदपत्रे जमा करण्यासाठी कमी वेळ देणे, अशी तक्रारही सरपंचांनी मांडली.
सेवा हमी कायदा व नागरिकांची सनद यावर या सभेत प्रदीर्घ चर्चा झाली. या चर्चेतून तलाठी व मंडल अधिकारी जाणीवपूर्वक कामामध्ये वेळकाढूपणा करतात, असा अनुभव प्रत्येक सरपंचाने यावेळी सांगितला. इंटरनेट नाही, सर्व्हर डाऊन आहे, ऑनलाईन सातबारा काम सुरू आहे, अशा सबबी सांगून जनतेची कामे टाळली जातात. त्यामुळे सर्वसामान्य माणसांना नाहक त्रास सहन करावा लागतो, अशी व्यथाही यावेळी उपस्थित सरपंचांनी मांडली.
एकूण चर्चा झाल्यानंतर या परिषदेमध्ये तलाठी व मंडल अधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर त्यांची येण्याची वेळ, वार, हजर नसल्यास त्याबाबतचे कारण याबाबत नियमितपणे कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर माहिती उपलब्ध करून मिळावी. जेणेकरून ग्रामस्थांची गैरसोय टळेल. याबाबत जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्याचे ठरले. यावेळी कृषी अधिकाऱयांच्या कामाबाबत सर्वच सरपंचांनी समाधान व्यक्त केले. यावेळी सरपंचांची व्यथा मांडणारे सरपंच परिषदेसारखे व्यासपीठ तयार केल्याबद्दल उपस्थित सरपंचांनी तिरवडे सरपंच विहंग गावडे यांचे आभार मानले. आप्पा भिसे यांनी परिषदेस उपस्थित असलेल्या सर्व सरपंचांचे श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.