येत्या आठवडय़ात मकर संक्रांतीचा उत्सव देश आणि देशाबाहेरही निरनिराळय़ा नावाने साजरा केला जाईल. आसाममध्ये या दिवसाला माघ बिहू, पंजाबमध्ये माघी, हिमाचल प्रदेशमध्ये माघी साजी, जम्मू, गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये उत्तरायण, तामिळनाडूमध्ये पोंगल, उत्तराखंडमध्ये घुघुटी तर ओडिशा, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवामध्ये मकर संक्रांत अशा अनेक नावाने या दिवसाला ओळखले जाते. या सर्वांचा उद्देश एकच आहे तो म्हणजे आजच्या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो. वैदिक कालगणनेनुसार चंद्र आणि सूर्य यांच्या भ्रमणानुसार वर्ष मोजले जाते. चंद्र आणि सूर्य हे भगवंताचे डोळे आहेत. त्यांच्या प्रकाशामार्फत सृष्टीमध्ये चालणाऱया सर्व प्राणिमात्रांच्या प्रत्येक हालचालीवर भगवंत नजर ठेवतात, अमावास्येच्या दुसऱया दिवसापासून चांद्र मास सुरू होतो तर प्रत्येक राशीनुसार सौर मास बदलतो. ज्यावेळी एका राशीतून दुसऱया राशीत सूर्य जातो त्याला संक्रमण काळ किंवा संक्रांत म्हणतात. जानेवारी महिन्यात येणाऱया संक्रांतीला मकर संक्रांती असे म्हणतात. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. या दिवसापासून उत्तरायण म्हणजे सूर्य उत्तर दिशेने पुढे सरकतो, इथून दिवसही मोठे होत जातात. या दिवशी सूर्य पूजेबरोबर लक्ष्मी आणि विष्णूची उपासना केली जाते. या दिवसाचे वैदिक शास्त्रामध्ये विशेष महत्त्व वर्णन केले आहे. या दिवशी गंगा नदीच्या काठावर राहणारे लोक गंगा नदीमध्ये स्नान करणे पवित्र मानतात. याच दिवशी विष्णूच्या चरणापासून अवतीर्ण झालेली गंगा भागीरथी ऋषींच्या महत्प्रयासाने आणि शिवजींनी आपल्या शिरावर धारण केल्यामुळे पृथ्वीतलावर वाहू लागली आणि आजच्या दिवशी गंगासागर येथे समुद्राला जाऊन मिळाली, म्हणून या दिवशी गंगा आणि समुद्राच्या संगमावर गंगासागर येथे लाखो लोक पवित्र स्नान करतात. कुंभमेळय़ाची सुरुवातही याच दिवसापासून होते. पितामह भीष्म यांनीही याच उत्तरायण पर्वामध्ये इच्छामरणाचा वर प्राप्त असल्यामुळे भगवान श्रीकृष्णाच्या उपस्थितीत आपला देहत्याग कुरुक्षेत्राच्या रणांगणावर केला होता. चैतन्य महाप्रभु यांनी याच दिवशी काटवा येथे 500 वर्षांपूर्वी संन्यास स्वीकारून हरिनाम प्रचारासाठी जगन्नाथपुरी येथे वास्तव्य केले. या दिवशी देवतांच्या दिवसाला सुरुवात होते. पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे देवतांचा एक दिवस आहे.
मकर संक्रांती दिवशी अनेक प्रांतांमध्ये अनेक प्रकारे लोक उत्सवाचा आनंद लुटतात. काही ठिकाणी थंडीचे शेवटचे दिवस म्हणून शेकोटी पेटवून त्याभोवती नृत्य, गायन, मिष्टान्न सेवन केले जाते. काही ठिकाणी आकाशात उंच उंच पतंग उडवून हा दिवस साजरा केला जातो. काही ठिकाणी पोंगल बनवून नव्या वर्षाची सुरुवात केली जाते. महाराष्ट्र, कर्नाटक, ओडिशा, गोवामध्ये तीळ आणि गुळापासून बनविलेले लाडू मित्र नातेवाईकांना वाटून आनंदाचा उत्सव साजरा केला जातो. मराठी भाषिकांमध्ये तिळगुळ वाटताना ‘तिळगुळ घ्या आणि गोड बोला’ अशा भावनापूर्ण शुभेच्छाही दिल्या जातात. मनामध्ये कितीही कटुता, राग, द्वेष, मत्सर, हेवेदावे इत्यादी दोष असले तरी या दिवशी कमीत कमी तिळगुळ देताना घेताना ‘गोड बोला’ अशी एक दुसऱयाकडून अपेक्षा केली जाते. केवळ ‘गोड बोला’ असे औपचारिकरित्या किंवा प्रघात म्हणून म्हटल्याने खरोखरीच एकमेकामधील संबंध ‘गोड’ होतीलच असे नाही त्यासाठी हे गोड बोलणे म्हणजे काय व कसे असावे याबद्दल वैदिक शास्त्र आणि ज्यांचे हृदय पूर्णपणे शुद्ध आहे अशा साधुसंतांकडून समजून घेणे महत्त्वाचे आहे.
भगवद्गीतेमध्ये 17 व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण शरीर, मन आणि वाचा (बोलणे) या इंद्रियामार्फत होणाऱया कार्यांना तपस्या असे संबोधित करतात. यामध्ये ‘वाचा’ बद्दल वर्णन करताना म्हणतात (भ गी 17.15) अनुद्वेगकरं वाक्मयं सत्यं प्रियहितं च यत् । स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्?मयं तप उच्यते । अर्थात ‘सत्य, प्रिय, हितकारक आणि इतरांना क्षुब्ध न करणारे शब्द बोलणे आणि नियमितपणे वेदपठण करणे यांना वाचिक तप असे म्हणतात.’ आपण ज्या ज्यावेळी बोलतो त्यामध्ये आपल्याला आनंद कसा मिळेल हा स्वार्थी विचार असतो आपण आपल्या समोरच्या व्यक्तीला काय वाटेल याचा विचार करत नाही. म्हणून या श्लोकामध्ये वर्णन केल्याप्रमाणे आपले बोलणे सत्य, सर्वांना प्रिय असे, हितकारक आणि इतरांना क्षुब्ध अथवा राग न येण्यासारखे असावे. यासाठी स्वाध्याय वाचन म्हणजे गीता-भागवत सारखे वैदिक ग्रंथ नित्यनियमाने वाचन करणे आवश्यक आहे. कारण यासारख्या वैदिक शास्त्रामध्ये सत्य म्हणजे काय याचे वर्णन येते. सत्य दोन प्रकारचे असते. एक जे आपल्या इंद्रियाद्वारे आपल्याला ज्ञात होते आणि दुसरे म्हणजे परम सत्य जे आपल्या हृदयामध्ये वास करत असलेल्या काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर ह्या षड्रिपूमुळे आपल्याला अनुभवता येत नाही. आपल्या इंद्रियांमुळे प्राप्त होणारे सत्य देश, काळ, व्यक्तीनुसार बदलत असते आणि वेगवेगळे असते आणि हेच आपल्या हृदयामध्ये एकमेकांबद्दल द्वेष इत्यादी दुर्गुण निर्माण करते. परम सत्य हे देश, काळ, व्यक्तीनुसार कधी बदलत नाही म्हणून सर्वासाठी प्रिय आणि हितकारक असते. आपल्याला गीता-भागवतमधील ज्ञानाची माहिती नसेल तर आपण जे बोलतो ते निरर्थक आहे. अशा निरर्थक बोलण्यातूनच स्वार्थी वृत्ती प्रकट होते आणि मनामध्ये द्वेष इत्यादी दुर्गुण निर्माण होतात. गीता भागवतच्या संदर्भानुसार बोलल्याने प्रत्येकाला ते ऐकण्यासाठी प्रिय वाटते आणि आपले मनुष्यजीवन सार्थकी लागून विचारही शुद्ध होतात. आपण जे वाचतो आणि ऐकतो तेच आपण बोलतो. म्हणून परमसत्य समजण्यासाठी गीता-भागवत वाचणे महत्त्वाचे आहे. नाहीतर आपले बोलणे कधीच सर्वार्थाने ‘गोड’ होणार नाही. श्रीमद् भागवतमध्येही आपले बोलणे कसे असावे याबद्दल मार्गदर्शन केले आहे. सारं सु÷g मितं मधु। अर्थात ‘आपले बोलणे अर्थपूर्ण, उचित, निवडक शब्दांनी संपन्न आणि अत्यंत कर्णमधुर असावे’ आणि हे केवळ गीता-भागवत, महाभारत, रामायण अशा आध्यात्मिक ग्रंथवाचनानेच आणि अशा ग्रंथाच्या आधारावर समाजाला मार्गदर्शन करणाऱया साधुसंतांच्या सहवासातच शक्मय आहे. वैदिक शास्त्रामध्ये निरर्थक बडबड ही पावसाळय़ामध्ये डराव डराव करणाऱया बेडकाप्रमाणे असल्याचे वर्णन केले आहे. बेडकाचे बोलणे त्याला कितीही गोड वाटले तरी त्याचा परिणाम मात्र त्याला गिळंकृत करण्यासाठी सापाला निमंत्रित करतो. तसेच आपले बोलणे आपल्याला कितीही गोड वाटत असले तरी काळरूपी सर्प आपल्याला गिळंकृत करीत असतो. म्हणून आपण बोलतो तो प्रत्येक शब्द आपले ‘धन’ आहे या भावनेने वापरला पाहिजे तरच आपले बोलणेही ‘गोड’ होईल. तेव्हा आपले बोलणे केवळ मकर संक्रांतीच्या दिवशीच ‘गोड’ न ठेवता आयुष्याचा प्रत्येक क्षण हरिनाम चिंतनाने गोड व्हावा यासाठी प्रयत्न करावयास शिकले पाहिजे.
-वृंदावनदास