प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील विविध रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत बाजारपेठेतील खड्डय़ांची दुरूस्ती करण्यात येत आहे. मात्र हे काम व्यवस्थित होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. तसेच खानापूर रोडच्या डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे.
तिसरे रेल्वे गेट ते उद्यमबागपर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. खानापूर रोड म्हणून ओळखल्या जाणाऱया या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्त्यावर अवजड वाहनांची वर्दळ मोठय़ा प्रमाणात असल्याने रस्ता खराब होतो. तिसरे रेल्वे गेट परिसरात रस्ता खराब झाल्याने वाहनधारकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. पावसाळय़ात वाहनधारकांचे हाल झाले होते. त्यामुळे रस्त्याची दुरूस्ती केली होती. हा रस्ता ठिकठिकाणी खराब झाल्याने पुन्हा डांबरीकरण काम हाती घेतले आहे. रस्ता व्यवस्थित केल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.