बेंगळूर/प्रतिनिधी
कोरोना व्यवस्थापनासाठी स्थापन केलेल्या कोविड टास्क फोर्सने, मंगळवारी, संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी सरकारच्या तयारीचा भाग म्हणून राज्यात ऑक्सिजन निर्मितीची क्षमता ४०० मे.टन वाढवण्याचा निर्णय घेतला. “आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या रुग्णालयांमध्ये यामध्ये २५० मेट्रिक टन ऑक्सिजनचा समावेश आहे. उर्वरित वैद्यकीय महाविद्यालये रुग्णालये आणि खासगी रुग्णालयात असेल. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत जिल्हा आयुक्तांकडून या सोयीसाठी विविध व्यवस्था करण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री अश्वथ नारायण यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यात ऑक्सिजन साठवण क्षमता २५००-२८०० मे.टन वाढवण्याचेही सरकारचे उद्दिष्ट आहे. “यामध्ये आरोग्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या १,८०६ मेट्रिक टन आणि वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयांमध्ये ५०० मेट्रीक टन यांचा समावेश असेल. प्रत्येक जिल्हा रुग्णालयात किमान २० मेट्रिक टन ऑक्सिजन साठवण क्षमता असेल आणि तालुका रुग्णालयात कमीतकमी ६ मेट्रिक टन साठवण क्षमता असेल, असे अश्वथनारायण यांनी सांगितले. ते म्हणाले की, द्रव ऑक्सिजन साठवण्यासाठी आवश्यक टँकर घेण्यासाठी जागतिक निविदा पाठविल्या जातील.
पुढे, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की संबंधित अधिकाऱ्यांना ऑक्सिजनयुक्त बेडची संख्या सध्याच्या ५८ हजारावरून वरून ८४ हजार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. “ऑक्सिजन साठवणुकीची सुविधा नसलेल्या खासगी रुग्णालयांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ऑगस्टच्या अखेरीस त्यांना अनिवार्यपणे व्यवस्था करावी लागेल, ” असे ते म्हणाले.