दोन डोसमध्ये 12 ते 16 आठवडय़ांचे अंतर : तज्ञांच्या शिफारशींना केंद्र सरकारची मंजुरी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोव्हिशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवून 12 ते 16 आठवडे म्हणजे 3 ते 4 महिने करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यासंबंधीची शिफारस सरकारच्या तज्ञ समितीने केली होती. मात्र, कोव्हिशिल्ड लसींच्या डोसमधील अंतर वाढविण्यात आले असले तरी कोव्हॅक्सिनच्या डोसमधील अंतरात कोणताही बदल केलेला नाही. सध्या कोव्हिशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर 6 ते 8 आठवडे इतके होते. मात्र आता कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर पुढील डोस थेट 3 ते 4 महिन्यांनंतर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधी तज्ञांच्या शिफारशींना सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे.
सर्वसामान्यांच्या लसीकरणाबरोबरच गर्भवतींच्या लसीकरणाबाबतही समितीने महत्त्वपूर्ण शिफारस केली आहे. गर्भवती महिलांसाठी देखील लस घेण्याची मुभा असावी असा सल्ला दिला आहे. त्यानुसार गर्भवती महिलांना लस घेता येईल आणि स्तनदा मातांना प्रसुतीनंतर लस घेता येईल, अशी शिफारस या गटाकडून करण्यात आलेली आहे.
कोरोनाविरोधात देशात सुरू असलेल्या लसीकरण अभियानात दोन लसींचा वापर होत असून सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या लसींचे प्रत्येकी दोन डोस नागरिकांना दिले जात आहेत. त्यातच देशातील अनेक राज्यांमध्ये या लसींचा तुटवडा आहे. तिसऱया टप्प्यातील लसीकरण सुरू केल्यानंतरही अनेक राज्यांमध्ये 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण अद्यापही गती घेऊ शकलेले नाही. लसींच्या तुटवडय़ामुळे मोहीम संथपणे सुरू असतानाच सरकारनियुक्त आरोग्य तज्ञांच्या पॅनेलने कोव्हिशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याची शिफारस केली आहे.
लॉकडाऊन वाढवण्याचा ‘आयसीएमआर’चा सल्ला
कोरोना संसर्गाचा दर 10 टक्क्याहून अधिक असलेल्या जिल्हय़ांमध्ये सहा ते आठ आठवडय़ांचा लॉकडाऊन लावण्याची गरज असल्याचे मत इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च अर्थात आयसीएमआरचे प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांनी व्यक्त केले आहे. भारतातील 718 जिल्हय़ांपैकी दोन तृतीयांश जिल्हय़ांमध्ये सध्याच्या परिस्थितीत कोरोना प्रादुर्भावाचा दर हा 10 टक्क्मयांहून जास्त असल्याची माहितीही त्यांनी दिली. देशातील कोरोनाच्या नवीन म्युटेंटमुळे तरुणांमध्ये कोरोनाचा प्रसार मोठय़ा प्रमाणावर होताना दिसत आहे. तसेच मोठय़ा प्रमाणावर तरुण लोक हे प्रवास करत असल्यामुळेही त्यांना जास्त प्रमाणात कोरोनाची लागण होत आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱया लाटेमध्ये जास्त काही अंतर नाही. या दुसऱया लाटेतही 40 वर्षांवरील लोकांनाही आरोग्याच्या समस्यांमुळे कोरोनाची लागण मोठय़ा प्रमाणावर होत आहे. या लोकांनाच सध्या कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याचेही भार्गव यांनी सांगितले.