प्रतिनिधी/ कराड
कराड शहरासह परिसरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहर पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळायला सुरूवात केली आहे. गत तीन महिन्यात जिल्हा पोलीसप्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल दहाजणांना कराड शहर व परिसरातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. हद्दपार केलेल्यांत नवख्या संशयितांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कराडच्या गुन्हेगारीत युवकही अडकत असल्याचे वास्तव चिंताजनक आहे.
कराड, मलकापूर शहरासह परिसरात गुन्हेगारी घटनांनी वारंवार खळबळ माजवली आहे. खून, मारामारी, खंडणी, दहशत माजवण्याचे प्रकार नेहमी घडत असतात. गेल्या दोन वर्षात टोळीयुद्धाने पुन्हा डोके वर काढले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीला चाप लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, आत्ताचे जिल्हा पोलीसप्रमुख अजयकुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गुन्हेगारीत नव्याने बस्तान बसवू पाहणारांच्या हद्दपारीचे प्रस्ताव केले. तत्कालीन डीवायएसपी सुरज गुरव आणि बी. आर. पाटील यांच्या जोडीने गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची मोहीम राबवली. गुन्हेगारीत नव्याने अडकत असलेली मुले चांगल्या कुटुंबातील असल्याचे लक्षात आल्यावर त्यांचे व पालकांचे समुपदेशन करण्यावरही भर दिला. मात्र जे गुन्हेगारीच्या गर्तेत खोलवर बुडाले आहेत, अशांवर हद्दपारीची कडक कारवाई करण्यास सुरूवात केली. बी. आर. पाटील यांच्या पुढाकाराने तीन महिन्यात दहाजणांवर हद्दपारीची कारवाई झाली आहे. यामधे सनी उर्फ गणेश सुनील शिंदे (रा. ओगलेवाडी), सुभाष उर्फ शुभम देवेंद्र कट्टीमणी (रा. कार्वे नाका), रोहित महादेव जाधव, प्रदुम्न उर्फ पद्या दीपक सोळवंडे (वय 25, वर्षे, रा. बुधवार पेठ), रोहित रमेश कारंडे (वय 23 वर्षे), विजय शिवाजी घारे, मनोज महादेव जाधव, अमोल जगन्नाथ भोसले, ओंकार युवराज थोरात ( सर्वजण रा. कराड) यांचा समावेश आहे.
अन्यथा घरदार सोडून जावे लागेल
वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी. आर. पाटील म्हणाले, पालकांनी आपली मुले कोणाच्या संगतीत आहेत, याची वारंवार माहिती घ्यावी. गुन्हेगारीचे आकर्षण वाढल्यास
घरदार सोडून वनवासात जावे लागण्याची परिस्थीती निर्माण होईल. त्यानंतर पालकांनी हतबल होण्यापेक्षा आत्ताच आपल्या पाल्याकडे लक्ष द्यावे. अन्यथा कोरोनातून वाचलो आणि आपल्याच वारसदाराकडून रोज मेल्यासारखे जीवन जगतोय, असे व्हायला नको.