- मुख्यमंत्र्यांच्या टीकेला कंगनाचे प्रत्युत्तर
ऑनलाईन टीम / मुंबई :
शिवसेना प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या टीकेला अभिनेत्री कंगना रनौतने ट्विट करत उत्तर दिले आहे.
तुम्ही जनतेचे सेवक आहात, महाराष्ट्राचे ठेकेदार नाही, मग ते महाराष्ट्र स्वतःच्या मालकीचा असल्यासारखे का वागतात? असा सवाल उपस्थित करत कंगनाने मुख्यमंत्र्यांची भाषा देश विभागण्याची असल्याचा आरोप देखील यावेळी केला आहे.
दरम्यान, रविवारी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘महाराष्ट्र सरकार, मुंबई पोलीस, ठाकरे कुटुंबिय, आदित्य ठाकरे आणि मुंबई पोलीस यांच्यावर सातत्याने चिखलफेक केली. यासंदर्भात बोलताना त्यांनी कंगनाच्या एका ट्वीटचाही उल्लेख केला ज्यामध्ये कंगनाने मुंबईची तुलना पीओकेशी केली होती. यासंदर्भात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘कोणीतरी म्हणालं होतं की, मुंबई पीओके प्रमाणे आहे. ही लोकं मुंबईत काम करण्यासाठी येतात आणि पुन्हा शहराचं नाव खराब करतात, असे म्हटले होते.
याला प्रत्युत्तर देत कंगनाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर टीका केली आहे. मुख्यमंत्री, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. लोकसेवक असून तुम्ही अगदी शुल्लक गोष्टींवरुन संघर्ष करत आहात. तुमच्याजवळ असलेली सत्ता तुमच्या मताशी सहमत नसलेल्यांचा अपमाप करण्यासाठी, त्यांना हानी पोहोचवण्यासाठी वापरत आहात. घाणेरडं राजकारण करुन मिळवलेल्या खुर्चीसाठी तुम्ही पात्र नाही. तुम्हाला लाज वाटायला हवी, असे म्हटले आहे.
पुढे कंगना म्हणाली की, ज्या प्रकारे हिमालयाचे सौंदर्य प्रत्येक भारतीयांसाठी आहे. त्यानुसारच मुंबईही सगळ्यांची आहे. तिथे मिळणाऱ्या संधी या प्रत्येक भारतीयांसाठी आहेत. उद्धव ठाकरे, आम्हाला लोकशाहीने दिलेला अधिकार हिरावण्याचा प्रयत्न करु नका. आम्हाला विभागण्याचा प्रयत्न करु नका. तुमची भाषणं तुमची अकार्यक्षमता दाखवतात, असा शब्दिक हल्ला तिने मुख्यमंत्र्यांवर चढवला.