दिल्ली-एनसीआरमध्येही पावसाचा इशारा : केरळ, तेलंगणात मुसळधार पाऊस
वृत्तसंस्था/ दिल्ली, हैदराबाद
तेलंगणात मुसळधार पावसामुळे अनेक भागांत हाहाकार निर्माण झाला आहे. राजधानी हैदराबादसह अनेक ग्रामीण भागात पूरसदृश परिस्थिती आहे. तसेच ओडिशामध्ये मुसळधार पावसामुळे ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. येथे अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. त्याचप्रमाणे राजधानी दिल्ली आणि उत्तर प्रदेश आणि हरियाणाच्या आसपासच्या भागातही पाऊस सुरू असून जोर वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
गेल्या दोन दिवसांपासून तेलंगणात सुरू असलेल्या पावसामुळे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी अधिकाऱयांना सतर्क राहण्याचे निर्देश जारी केले आहेत. जयशंकर-भुपलपल्ली जिह्यातील गावात पुराच्या विळख्यात अडकलेल्या शेतकऱयांना हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. शेतकरी कामानिमित्त शेतात वावरत असतानाच अचानक त्यांना पुराच्या पाण्याने वेढले होते. अचानक नदीकाठचे पाणी वाढू लागल्यामुळे हवाई दलाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने शेतकऱयांना बाहेर काढण्यात आले.
करीमनगरमध्येही पूरस्थिती असून पाण्याच्या प्रवाहामुळे उड्डाणपुलावर अडकलेल्या दुचाकीस्वाराला पोलीस आणि स्थानिकांनी वाचवले. राज्यात मुसळधार पावसामुळे बरीच धरणे व कालवे ओसंडून वाहत आहेत. बऱयाच ठिकाणी पुराचे पाणी रस्ते वाहून गेले आहेत. विजयवाडा जिल्हय़ात संततधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाण्याची पातळीही वाढली आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी दोन हेलिकॉप्टर सज्ज ठेवण्यात आली आहेत.
एनसीआर, उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणा आदी भागातही हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. अलिगड, बुलंदशहर, ग्रेटर नोएडा, खुर्जा, मोदीनगर, रेवाडी, दिल्ली, जटारी, देवग येथे बऱयापैकी पावसाची स्थिती दिसून येत होती.
ओडिशातही मुसळधार
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ओडिशातही जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. मालकनगिरी जिह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. येत्या 24 तासात ओडिशाच्या बऱयाच भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्मयता आहे. गुरुवारपासून राज्यातील बऱयाच ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे मलकनगिरी, भद्रक, ढेंकनाल, जाजपूर, कटक आणि केंद्रापाडा जिह्यातील अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. उर्वरित राज्यातही अशीच स्थिती आहे. पुराच्या पाण्यामुळे रस्तेही जलमय बनले असून काही ठिकाणी लोकांना अन्यत्र हलविण्यात आले आहे. संततधार पावसामुळे भातशेतीही खराब झाली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक घरांचे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी रस्ते बंद झाल्यामुळे गावांचा संपर्क तुटला आहे.
केरळमधील इडुक्की जिह्यातील राजमाला येथे दरड कोसळल्यामुळे आणखी दोन मृतदेह सापडल्यामुळे मृतांची संख्या 58 झाली आहे. हरवलेल्या 12 जणांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. गेल्या शुक्रवारी या भागात एक भूस्खलनामुळे डोंगर कोसळण्याची दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत चहा बागेत काम करणाऱया कामगारांच्या झोपडय़ा मातीच्या ढिगाऱयाखाली गेल्या होत्या.