प्रतिनिधी/बेळगाव
कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी तोंडाला मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, याकडे नागरिक दुर्लक्ष करीत आहेत. याबाबत जागृती करण्याची मोहीम महापालिकेकडून राबविण्यात येत असून याकरिता ध्वनिक्षेपकाचा आधार घेण्यात आला आहे. महांतेशनगर, एपीएमसी अशा विविध भागात गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्यासाठी माईकद्वारे आवाहन करण्यात येत आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार झपाटय़ाने होत असल्याने विविध मार्गसूची आरोग्य खात्याने तयार केल्या आहेत. विषाणूची लागण होऊ नये याकरिता खबरदारीच्या उपाययोजना म्हणून सामाजिक अंतर राखणे, तोंडाला मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे, बाहेरून घरी आल्यानंतर हात-पाय स्वच्छ धुणे अशा विविध सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र, शहरात काही नागरिक तोंडाला मास्क लावत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.
महापालिकेच्या पर्यावरण साहाय्यक अभियंत्यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. विविध चौक, भाजीमंडई, एपीएमसी मार्केट, व्यावसायिक आस्थापने अशा विविध ठिकाणी गर्दी होत असल्याने त्या ठिकाणी मास्क लावण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. दररोज विविध परिसरात ही मोहीम राबविण्यात येत असून बुधवारी ही मोहीम महांतेशनगर व एपीएमसी यार्डमध्ये मनपाच्या पर्यावरण साहाय्यक अभियंत्या महादेवी, स्वच्छता निरीक्षक श्रवण कांबळे यांच्यासह कर्मचाऱयांच्या उपस्थितीत राबविण्यात आली.