व्होडली डिचोलीतील प्रेमनाथ च्यारी उर्फ बाला यांची कामगिरी. 16 वर्षांचा असताना केली होती सुरूवात. छंद म्हणून केलेल्या कामामुळे सर्वत्र वेगळी ओळख. या कामासाठी आज तीन जणांना ठेवले आहे कामावर.
रविराज च्यारी/ डिचोली
16 वर्षांचा असताना बाजारातून तेलाचे पत्र्यांचे डबे आणायचे, ते कापून त्यांच्या पट्टय़ा तयार करायच्या, त्या पट्टय़ा नंतर रबीटच्या सहाय्याने जोडून आकाशकंदीलाचा साचा तयार व्हायचा… आज सर्वकाही बदलले असून पट्टय़ा रेडिमेड मिळतात आणि त्या जोडण्यासाठी रबीटची गरज पडत नाही, तर स्पॉट व्हेंल्डीगच्या सहाय्याने अलगतपणे आकाशकंदीलाचा साचा तयार होतो. विद्यार्थी दशेत केवळ छंद म्हणून आपण सदर आकाशकदील बनवत होतो. त्यावेळी जेमतेम वीस तीस आकाशकंदील व्हायचे. त्यामुळे शिक्षण आणि स्वतःच्या खर्चाची तजवीज व्हायची. आज सर्व सामान रेडिमेड आणि स्पॉट वेल्डिगमुळे काम सहज होत आहे. आज आपण वर्षाला 15 हजारांच्या वर आकाशकंदीलांचे साचे बनवतो..
छंद म्हणून या कामाची सुरूवात करणारे व्ह?डली डिचोली येथील प्रेमनाथ सदाशिव च्यारी उर्फ “बाला” याच्या आतापर्यंतच्या वाटचालीची हि कहाणी. घरची परिस्थिती समजून घेत स्वतःच्या पायावर विद्यार्थी दशेतच एका छंदाच्य सहाय्याने उभे राहण्याची मनात तिव्र इच्छा आणि जिद्द धरून तसेच सातत्य राखून बाला यांनी आज आपले नाव संपूर्ण गोव्यात तसेच गोव्याबाहेरील राज्यांमध्येही पोहोचविले आहे. दिवाळी तोंडावर असली तरीही त्यांच्या वर्कशॉपमधून आकाशकंदीलांचे साचे गाडय़ा भरून भरून बाहेर सरताना दिसतच आहेत. 16 वषीय असताना छंद म्हणून सुरू केलेले हे काम म्हणजे आज बाला यांचा मुख्य व्यवसाय बनला आहे. त्यात त्यांना पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांचीही मोलाची साथ मिळत आहे. प्रारंभीच्या काळात केवळ वीस तीस आकाशकंदील होत होते.
1988 साली आपण 16 वर्षे वयाचा असताना हे काम केवळ एक छंद म्हणून हाती घेतले. बाजार त येणारे आकाशकंदील पाहिल्यावर आपण ते पत्र्याच्या पट्टय़ांपासून बनवू शकतो याचे तंत्र मनात आणून बाजारातून तेलाचे पत्र्यांचे डबे आणायचे. ते पध्दतशीरपणे फोडून त्याच्या आवश्यक आकाराच्या लांब व रूंद पट्टय़ा तयार करायच्या. आणि सदर पट्टय़ा रबीटच्या सहाय्याने जोडून आकाशकंदीलाचा साचा तयार करायचा. त्यावेळी आपण लहान असल्याने आपल्या हातून आकार घेत असलेल्या प्रत्येक आकाशकंदीलखच्या साचाचे बरेच कुतूहल वाटायचे आणि त्यातूनच प्रोत्साहन मिळून आपण अधिकाधिक बनविण्यासाठी प्रयत्न करायचो. परंतु चार पाच दिवस लागून केवळ वीस ते तीस आकाशकंदील व्हायचे. ते विक्रीस गेल्यानंतर काही प्रमाणात आर्थिक मिळकत व्हायची. त्याने दिवळीचा खर्च निभावत होता. तसेच स्वतःच्या खर्चासाठीही लाभ व्हायचा. ऑर्डर्स वाढू लागल्या आणि सामान रेडिमेड मुंबईहून आणण्यास सुरुवात केली.
काही वर्षे डबे फोडून त्याच्याच पट्टय़ांचे आकाशकंदील साचे करायचो. त्यानंतर कुणाच्यातरी ओळखीतून मुंबईत संपर्क झाला आणि 1995 साला पासून मुंबईतून पत्र्याच्या रेडिमेड पट्टय़ा आणून त्याचे साचे बनवायला लागलो. त्यावेळी आकाशकंदीलांची संख्याही वाढली होती आणि लोकांकडून ऑर्डर्सही वाढू लागल्या होत्या. वीस तीस साचापासून सुरू झालेले काम त्यावेळी दोन हजारांपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे रेडिमेड पट्टय़ा मागविण्यावाचून पर्याय नव्हता. 1995 पासून कुणाच्यातरी संपर्कातून मुंबईहून पट्टय़ा उपलब्ध करून घेत असतानाच 2002 सालापसून आपण स्वतः मुंबईत जाऊ लागलो. आणि आपल्या या कामासाठी आवश्यक असलेल्या चांगल्या दर्जाच्या पट्टय़ा आणू लागलो. त्यानंतर या साचांची ऑर्डर वाढतच गेली होती.
स्पॉट वेल्डिगमुळे काम सहज आणि सोपे बनले.
त्यानंतर आकर्षक आणि दर्जेदार आकाशकंदीलांचे साचे म्हणून ख्याती वाढतच गेली आणि वर्षांगणीक ऑर्डर्स वाढतच गेल्या. 2010 पर्यंत आम्ही रबीटच्या सहाय्यानेच साचे जुळवत होतो. तर त्यानंतर स्पॉट वेल्डिगचे तंत्र विकसित झाले आणि त्याचा सर्वात मोठा आधार या कामात होऊ लागला. रबीट ठोकण्याच्या बदल्यात स्पॉट वेल्डिगने काम सहज आणि सोपे तसेच कमी वेळात होऊ लागले. त्यामुळे या ताशी साचे बनविण्याचा वेग आणि संख्याही वाढली. ती संख्या आज 2021 साली 15 हजारांच्या वर पोहोचली आहे. आज या कामासाठी आपण तीन बेरोजगारांना कामावर ठेवले आहे. या कामातून त्यांच्या कौटुंबिक जिवनाला आर्थिक आधार मिळतो, यापेक्षा मोठे समाधान आणखीन कोणतेही नाही.
गणेश चतुर्थीपूर्वीच कामाला होतो प्रारंभ.
आज या कामाचा व्याप वाढत्या ऑर्डर्समुळे बराच लाढला असल्याने या कामाला गणेश चतुर्थीपूर्वीच सुरूवात होते. साधारण मे महिन्यात आपण मुंबईत जाऊन पट्टय़ांच्या मालाची ऑर्डर देऊन येतो. पावसापूर्वीच जर सदर सामान आल्यास पावसात त्याला गंज चढतो. म्हणून पावसाळा मध्यावर पोहोचल्यावर सामान उपलब्ध केले जाते आणि श्रावण मासारंभापासूनच कामाला सुरूवात होते. तरी जर एखाद्या वेळी त्यापूर्वीच सामान उपलब्ध झाल्यास आषाढी एकादशीचा मुहूर्त साधूनही काम सुरू केले जाते. श्रावण, गणेश चतुर्थी या उत्सवांवेळीही आमचे हे काम चालूच राहते. जसजशी दिवाळी जवळ येऊ लागतो तसतसा या कामातील वेग वाढू लगतो. एव्हाना सकाळी 5 वा. उठून कामाला सुरुवात करायची आणि रात्री 12 वाजेपर्यंत काम बंद करायचे असा नियमच आम्ही घालून घेतला आहे. परंतु कामाचा ताण वाढल्यास रात्रीचा काम बंद करण्याचा वेळ एक एकदा 2 किंवा 3 सुध्दा होतो.
गोवा व बाहेरीलही राज्यातूनही ग्राहक येतात.
आज हे डिचोलीतील व्ह?डली येथे तयार होणारे आकाशकंदीलांचे साचे गोव्यात सर्वत्र विविध ग्राहकांकरवी नेले जातातच. पण महाराष्ट्र राज्यातील दोडामार्ग व परिसरात तसेच वेंगुर्ला, सावंतवाडी व इतरही भागांमध्ये जातात. दुरदूरचे ग्राहक खास ऑर्डर्स देऊन एकेक वेळा हजाराहूनही जास्त आकाशकंदीलांचे साचे घेऊन जातात. आज या व्यवसायात अनेकां?नी प्रवेश केला आहे. तरीही ग्राहक आपल्याकडे गेल्या अनेक वर्षांचे संबंध राखून येतात. त्यांना समाधानकारक सेवा आणि दर्जेदार साजे देण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध असतो. आपण विविध फेब्रिकेशनचे काम पूर्वीपासूनच करत आलेलो आहे. परंतु एक छंद म्हणून सुरू केलेला हा आकाशकंदीलांचे साचे बनविण्याचा व्यवसाय आता मुख्यच व्यावसाय बनला आहे. तरीही आपण आजही इतर फेब्रिकेशन कामावर दुर्लक्ष केलेले नाही. तेही काम चालूच असते.
कोणत्याही छंद कामाप्रती श्रध्दा बाळगा
आकाशकंदीलांचे साचे बनविण्याच्या कामात पत्नी व दोन्ही मुलांचे मोलाचे सहकार्य व मदत बाला यांना लाभत असते. तसेच वाडय़ावरील लोकांकडूनही अपेक्षित पाठिंबा मिळत असल्याने या कामातील आपले प्रोत्साहन वाढत गेले आहे. दरवषी ग्राहकही मोठय़ा विश्वासाने आपल्याकडील हे साचे मोठय़ा संख्येने नेण्यासाठी येतात. त्यांच्याच प्रेरणेतून आपली या कामातील श्रध्दा दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. कोणतेही काम किंवा छंद असूदे त्यात आपली आत्मयिता आणि कामाप्रती श्रध्दा सर्वात महत्वाची आहे. हि श्रद्धा बाळगून आपण जर काम केले तर त्यात यश हे नक्कीच मिळते, हा आपला तरी आजपर्यंतचा अनुभव आहे, असा संदेश बाला च्यारी यांनी या प्रतिनिधीशी बोलताना दिला.