ओटवणे /प्रतिनिधी-
तौक्ते चक्रीवादळात घर जमीनदोस्त झालेल्या मालवण तालुक्यातील कोळंब येथील नरहरी विष्णू परब यांना निवाऱ्यासाठी सावंतवाडीतील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेने मदतीचा हात दिला असुन पन्नास हजार रुपयांचा धनादेश या प्रतिष्ठानच्या वतीने नरहरी परब यांना देण्यात आला. तसेच घराचे काम सुरु झाल्यानंतर आणखी मदत देण्याची ग्वाही सिंधुमित्र प्रतिष्ठानने श्री परब यांना दिली.
तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील वेंगुर्ले व मालवण तालुक्यात अक्षरशः हाहाकार उडून व अपरिमित हानी झाली. घरे बागायती जमिनदोस्त होऊन क्षणात होत्याचे नव्हते झाले.
कोळंब येथील नरहरी परब यांच्या वडिलोपार्जित मातीचे जीर्ण घरावर आंब्याचे झाड कोसळून पत्रे व कौले तुटली. घर जमीनदोस्त झाल्याने त्यांना शेजारील घरात आश्रय घ्यावा लागला. नरहरी परब मच्छीमारी बोटीवर रोजंदारीवर काम मिळेल त्यावेळी जातात. त्यामुळे घरची परिस्थिती गरिबीची असुन पत्नी अपंग आहे तर मुलगा शाळेत शिकत आहे. तौक्ते चक्रीवादळात घर जमीनदोस्त झाले मात्र आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना घर बांधणे शक्य नव्हते. त्यानंतर ग्रामस्थांनी एकत्रित येऊन त्यांच्या घराला प्लास्टिक बांधून दिले. त्यामुळे त्यांची तात्पुरती राहण्याची सोय झाली.
दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते डॉ. पंकज दिघे यांच्याकडे नरहरी परब यांनी आपल्या घराची कैफियत मांडली. त्यानंतर डॉ
पंकज दिघे यांच्या माध्यमातून त्यांनी घराच्या आवश्यक मदतीसाठी सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानकडे अर्ज केला. त्यानंतर सिंधुमित्र प्रतिष्ठान कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर श्री परब यांना घराच्या आवश्यक बांधकामासाठी रुपये पन्नास हजार रुपये मदत देण्याचे ठरले. यासाठी मुंबई येथील या प्रतिष्ठानच्या दात्यांनी पुढाकार घेऊन मदत केली. श्री परब यांना रुपये पन्नास हजारांचा धनादेश डॉ. पंकज दिघे यांच्याहस्ते देण्यात आला. प्रतिष्ठानच्या अनपेक्षित मदतीमुळे परब कुटुंबिय भारावून गेले. आता लवकरच घराचे बांधकाम सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रवीणकुमार ठाकरे, पवन बांदेकर, भार्गवराम शिरोडकर, सीए लक्ष्मण नाईक, अँड्र्यू फर्नांडिस तसेच कोळंब ग्रामस्थांच्या उपस्थित होते.
सिंधूमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान ही संस्था निःस्वार्थीपणे समाजसेवा करणारी संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जातात. यात शैक्षणिक, आरोग्यविषयक, सामाजिक जागरण प्रबोधन, तसेच गरजूंना आवश्यक मदत दिली जाते. या संस्थेच्या माध्यमातून डॉ डी. बी. खानोलकर रुग्ण सेवा केंद्र चालविले जाते. याचा लाभ आजपर्यंत शेकडो रुग्णांनी घेतला आहे. आता कोळंब येथील श्री परब यांना मदतीचा हात देऊन सिंधुमित्रांनी पुन्हा एकदा आपला सेवाभाव जपत सामाजिक कार्यात निरंतरता राखली आहे.