प्रतिनिधी / ओरोस:
तौक्ते चक्रीवादळात झालेल्या कृषीविषयक नुकसानीपोटी शासनाने सिंधुदुर्ग जिल्हय़ाला 17 कोटी रुपये मंजूर केले आहेत. शासनाकडून नुकसान भरपाईची रक्कम प्राप्त होताच त्याचे वितरण करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद कृषी समितीची मासिक सर्वसाधारण सभा जि. प. उपाध्यक्ष तथा कृषी समिती सभापती राजेंद्र म्हापसेकर यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. यामध्ये समिती सचिव तथा जिल्हा कृषी विकास अधिकारी सुधीर चव्हाण, सदस्य संजय देसाई, वर्षा पवार, अनुप्रीती खोचरे, सायली सावंत, गणेश राणे, रणजीत देसाई, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. एन. म्हेत्रे, अधिकारी, खातेप्रमुख आदी सहभागी झाले होते.
16 मे रोजी झालेल्या तौक्ते वादळात सिंधुदुर्ग जिल्हय़ात शेती व बागायतीचे मोठे नुकसान झाले होते. 4 हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतीची हानी झाल्याचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून शासनाला पाठविण्यात आला होता. त्यानुसार शासनाने ही रक्कम मंजूर केली आहे. याबाबतचा शासन निर्णय झाला आहे. मात्र, पैसे अद्याप आले नसल्याचेही म्हेत्रे यांनी स्पष्ट केले.
कृषी दिन 1 जुलैला
दरम्यान, तौक्ते चक्रीवादळ नुकसानीचे पंचनामे रितसर झाले नसल्याचा आरोप सदस्य गणेश राणे यांनी केला आहे. 24 मे रोजी पहिला पंचनामा अहवाल पाठविण्यात आला. त्यानंतर 31 मेपर्यंत उर्वरित नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू होते. त्यामुळे शासनाला सादर करण्यात आलेल्या अहवालाबाबत राणे यांनी साशंकता व्यक्त केली. यावर्षी कृषी दिनानिमित्त एक जुलैला होणारा कार्यक्रम साळगाव ग्रामपंचायतीत होणार असल्याचे म्हापसेकर यांनी सांगितले. तसेच रत्नसिंधु योजनेत पॉवर ट्रक्टर उपकरणाचा समावेश करण्यात यावा आणि त्याच्या खरेदीसाठी निधी मिळावा, अशी मागणी करणारा ठराव शासनाला पाठविण्याचे आदेश म्हापसेकर यांनी दिले.
गतवर्षी मंजूर करण्यात आलेल्या योजनांच्या प्रस्तावापैकी ज्या लाभार्थ्यांनी अद्याप वस्तू खरेदी केलेली नाही. त्यांच्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे. लाभार्थ्यांनी त्यापूर्वी वस्तू खरेदी केल्याच्या पावत्या जमा कराव्यात, असे आवाहन म्हापसेकर यांनी केले आहे.