ऑनलाईन टीम / मुंबई :
कर्नाटक आणि गोवा किनारपट्टीला तौत्के चक्रीवादळाने चांगलेच झोडपून काढले आहे. महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवरील काही जिल्ह्यात या वादळाचा परिणाम जाणवला. सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांना वादळाचा तडाखा बसला आहे. अनेक ठिकाणी घरे कोसळली तर झाडेही उन्मळून पडली आहेत. सोमवारी चक्रीवादळामुळे रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
तौत्के चक्रीवादळाचा मुंबईला कोणताही धोका नसला तरी हवामान विभागाने मुंबई व परिसराला ऑरेज अलर्ट दिला आहे. मुंबईला वादळाचा धोका नसला तरी हे चक्रीवादळ मुंबईनजीकच्या समुद्रातून जाणार असल्याने त्याच्या प्रभावाने मुंबईत पाऊस होण्यासह वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. त्यानुसार मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज ॲलर्ट व तर, रायगडला रेड ॲलर्ट देण्यात आला आहे.
सोमवारी तौत्के चक्रीवादळाचा रायगड, मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला समांतर समुद्रातून प्रवास होणार असून, वादळाच्या वाढत्या तीव्रतेमुळे प्रशासनातर्फे या पट्ट्यात रेड ॲलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्याला रेड ॲलर्ट जारी केल्यामुळे जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सकाळपासूनच मुंबई गोवा हायवे वर पाऊस सुरू झाला आहे. रायगडमध्ये तर काल रात्रीपासून जोरदार पाऊस पडली आहेत. अनेक घरांवरील पत्रे उडून गेले आहेत. रस्त्यावर झाडे पडली आहेत. आतापर्यंत तब्बल 8 हजार 360 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. जिल्ह्यात झाडे कोसळल्याने अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. तर अनेक घरांचे नुकसान झाले असल्याचे वृत्त आहे.
- नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
नागरिकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. नागरिकांनी आज व उद्या घरातच राहावे. अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. समुद्र किनारी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईत रस्त्याच्या कडेला वा वस्तीत धोकादायक स्थितीत होर्डिंग असल्यास ते हटवण्याची सूचनाही संबंधितांना देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील लसीकरण केंद्र आज बंद ठेवण्यात आली आहेत.