शिवडे पाणी चोरी प्रकरणी बागायतदारांचा खुलासा
प्रतिनिधी
धारबांदोडा
शिवडे धारबांदोडा पाणी प्रकल्पातील पाणी चोरटय़ा मार्गाने वळविले जात नव्हते, तर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱयांच्या मान्यतेनेच बागायतीसाठी मोफत पुरविण्यात येत होते, असे स्पष्टीकरण संबंधीत बागायदारांनी दिले आहे. प्रकाश गावठणकर, गुरुदास गावठणकर व वासू गावठणकर यांनी सोमवारी प्रसार माध्यमांसमोर हा खुलासा केला.
शिवडे पाणी प्रकल्पातून अशाप्रकारे मोफत पाणी पुरवठा होत असल्याची माहिती बांधकाम खात्याच्या अधिकाऱयांना होती. त्यामागे अलिखित करार झाल्याचे या बागायतदारांनी स्पष्ट केले. सन 2007 साली या प्रकल्पाची पायाभरणी माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्याहस्ते झाल्यानंतर बांधकाम खात्याच्या अधिकाऱयांनी प्रकल्पासाठी जमिनी बद्दल आमच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी कुटुंबातील तिघा व्यक्तींना पाणी विभागात रोजगार द्यावा व बागायतीसाठी मोफत पाणी पुरवठा करण्याची अट घातली होती. पाणी विभागाने ती मान्य करून स्वखर्चाने या पाण्याच्या जोडण्या जोडून दिल्या होत्या. त्या आधारे आपल्या कुटुंबाने बँकेतून कर्ज घेऊन बागायती वसवली. मात्र आता पाण्याच्या जोडण्या तोडण्यात आल्याने कुटुंबीयांसमोर बागायती अडचणित आली आहे, असे गुरुदास गावठणकर यांनी सांगितले.
लेखी हमी घेतली नाही, तिच चूक झाली…!
सर्व्हे क्र. 32/1 मध्ये पाण्याचा पंप बसविण्यात आला असून सर्व्हे क्र. 28/1 मध्ये मुख्य टाकी व पाणी जलशुद्धिकरण टाकी बांधण्यात आली आहे. मुख्य जलशुद्धिकरण टाकीकडे जाण्यासाठी रस्त्याची आवश्यकता होती. त्यावेळी तत्कालीन कनिष्ठ अभियंते आणि इतरांनी टाकीकडे जाण्यासाठी जमिन देण्याची मागणी केली. त्याबदल्यात बांधकाम खात्यातर्फे पाणी जोडण्या मोफत देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यानुसार पाण्याच्या जोडण्या करून देण्यात आल्या हे पाणी बागायतीसाठी वापरता येईल व प्रत्येक कुटुंबाला एक रोजगार देण्याची हमी देण्यात आली होती. हा सर्व व्यवहार परस्पर समजुतीवर करण्यात आला होता. व्यावहारासंबंधी लेखी स्वरुपात कागदपत्र देण्याची मागणी करण्यात आली असता आमच्यावर विश्वास ठेवा असे अधिकाऱयाकडून सांगण्यात आले होते, असे या बागायतदारांचे म्हणणे आहे. त्यावेळी लेखी स्वरुपात कागदपत्रे न घेतल्याने आज आपले कुटुंब अडचणित आले आहे, असेही गावठणकर कुटुंबियांनी सांगितले.
बागायती अडचणित, आता जगायचे कसे ?
गावठणकर कुटुंबीयांच्या तिघापैकी एकटय़ाने सांगितले की, आपण त्यावेळी नोकरीची मागणी केली. मात्र आपले वय 56 असल्याने नोकरी देणे शक्य नव्हते. त्याबदल्यात मोफत मिळणाऱया पाण्यातून बागायती करा असा सल्ला आपल्याला पाणी विभागाच्या अधिकाऱयांकडून देण्यात आला. मात्र आता पाण्याच्या जोडण्या तोडण्यात आल्याने उदरनिर्वाहाचे साधन असलेली बागायती अडचणीत आली आहे. आपल्या पदरात तीन मुले असून ती शिक्षण घेत आहेत. अशा वेळी आपण जगावे कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे.
बांधकाम खात्याने या प्रश्नावर योग्य तो निर्णय घेऊन बागायतीमध्ये पाणी पुरवठा करावा व आपल्या कुटुंबीयांना रोजगार द्यावा, अशी मागणी गावठणकर कुटुंबियांनी केली आहे. त्यासंबंधी एक निवेदन त्यांनी बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांना दिले आहे. यासंबंधी अधिक माहिती देताना गुरुदास गावठणकर म्हणाले की, सन 2012 साली तत्कालीन बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर शिवडे येथे पाणी प्रकल्पाची पाहणी करण्यात आले असता आपल्या कुटुंबीयांनी त्यांना निवेदन सादर करुन पाण्याच्या जोडण्या तोडण्यात येऊ नये अशी मागणी केली होती. त्यावेळी मंत्र्यांनी प्रकल्पात पाणी मुबलक असल्याने पाणी जोडण्या तोडू नये असा आदेश संबंधित अधिकाऱयांना दिला होता असे ते म्हणाले.
सन 2007 साली प्रकल्पाच्या पायाभरणी कार्यक्रमात बोलताना तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी जमीन देणाऱयांना रोजगार उपलब्ध करून देण्याविषयी विचार करू असे आपल्या भाषणात सांगितले होते. या प्रकल्पाचे 2 ऑक्टोबर 2010 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याहस्ते उद्घाटन झाले होते, अशी माहिती गावठणकर कुंटुंबियांनी दिली.