किरण मानेंच्या असभ्य वर्तनामुळे मालिकेतून काढून टाकल्याचा प्रॉडक्शनची माहिती
प्रतिनिधी/ सातारा
राजकीय पोस्ट केल्याने मला कामावरुन काढून टाकल्याचा कांगावा करणारे अभिनेते किरण माने यांच्यावर आज मालिकेतील महिला कलाकारांनी टॉन्ट मारत असल्याचे व असभ्य वर्तन करण्याचे आरोप करण्यात आले असून या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. दरम्यान, गुळूंब ग्रामपंचायतीच्या सरपंचांच्या सहीच्या पत्राबाबत तर वेगळयांच रंजक कहाण्या आता समोर येवू लागल्या आहेत. प्रॉडक्शन मॅनेजर ससाणेंकडून चित्रीकरण सुरुच राहणार आहे. किरण मानेंना तीन वेळा समज दिली गेली होती. त्यांच्या वागण्यात सुधारणा न झाल्याने त्यांना कामावरुन काढून टाकल्याचे सांगण्यात आले.
सातारा जिह्यात अनेक चित्रपट व मालिकांचे चित्रीकरण होत असतात. कोरोनाच्या काळातही जसे सुरु होते तसेच आताही चित्रीकरण सुरु आहेत. असेच स्टार प्रवाह या मालिकेचे चित्रीकरण गुळूंब येथे सुरु आहे.. त्या मालिकेचे रेकॉर्ड सध्या सुरु आहे. त्याच मालिकेतील विलास पाटील यांचे पात्र साकारणारा अभिनेता किरण माने याने गेल्या चार दिवसांपासून सोशल मीडियावर स्वतःच राजकीय पोस्ट केल्याच्या कारणावरुन कामावरुन कमी केल्याचा कांगावा केला होता. त्याच अनुषंगाने आज किरण मानेंच्या बाबत चित्रीकरण ठिकाणाहून प्रॉडक्शन मॅनेजर यांनी मीडियाकडे माहिती दिली की किरण माने यांची वागणूक योग्य नव्हती. ते असभ्य वागत होते. महिलांना टॉन्ट मारायचे. म्हणून गेल्या दीड वर्षात तीन वेळा त्यांना सूचना दिली होती. परंतु त्यांच्या वागण्यात बदल न झाल्याने मालिकेच्या रेप्युटेशनसाठी त्यांना पूर्वकल्पना देऊन काढण्यात आले आहे. त्यांचा आरोप धांदात खोटा आहे, असे सांगण्यात आले. दरम्यान, तेथील काम करणाऱया महिला कलाकारांनी त्याबाबतही आरोप केले.
त्या पत्राबाबत रंजक कथा
गुळुंब गावच्या सरपंच यांच्या सहीचे पत्र काल व्हायरल झाले. त्याबाबत आज वाई तालुक्यात रंजक कथांची चर्चा सूर आहे. काही तरुणांनी महिला सरपंचाकडून कोरे लेटरपॅड घेतले. त्यावर सही घेतली अन् नंतर मजकुर टाकला. त्या मजकुराबाबत दस्तुरखुद्द सरपंच यांनाही कल्पना नव्हती, अशी. याबाबत खात्री करण्यासाठी त्या लेटरपॅडवरील नंबरवर फोन करण्याचा प्रयत्न केला असता तोही बंद लागला. तर त्या लेटर पॅडबाबतही कलाकरांनी स्पष्टीकरण दिले आहे.