अगरतळा पालिकेसह अनेक ठिकाणी विरोधकांचे उघडले नाही खाते
वृत्तसंस्था/ अगरतळा
उत्तरप्रदेश निवडणुकीपूर्वी भाजपसाठी एक खूशखबर समोर आली आहे. त्रिपुरामधील स्थानिक निवडणुकीत भाजपला 334 पैकी 329 जागांवर विजय मिळाला आहे. तर अगरतळासह अन्य पालिकांमध्ये विरोधी पक्षांना खातेही उघडता आले नाही. भाजपने अगरतळामधील सर्व 51 प्रभागांमध्ये विजय मिळविला आहे.
अगरतळा पालिका आणि 13 नगरपालिकांच्या 222 जागांसाठी रविवारी मतमोजणी झाली आहे. यात सत्तारुढ भाजपने अत्यंत मोठा विजय मिळविला आहे. भाजपने खोवाई, कुमारघाट नगरपालिका, सबरुम, अमरपूर, कैलाशहर, तेलियामुरा, मेलाघर आणि बेलोनियो नगरपरिषदांसह धर्मपूर आणि अंबासा नगर पालिका, पानीसागर, जिरानिया तसेच सोनापुरा नगरपंचायींमध्येही मोठा विजय मिळविला आहे.
112 ठिकाणी बिनविरोध
राज्यात शहरी स्थानिक संस्थांच्या 334 जागा आहेत. सत्तारुढ भाजपने सर्व जागांवर उमेदवार उभे केले आणि यातील 112 ठिकाणी बिनविरोध विजय मिळविला आहे. त्रिपुरा नगरपालिका निवडणुकीच्या निकालांनी ईशान्य भारतात अस्तित्व निर्माण केल्याच्या तृणमूल काँग्रेसच्या दाव्यांमधील पोकळपणा उघड केला असल्याचे उद्गार भाजप उपाध्यक्ष दिलीप घोष यांनी काढले आहेत.
डाव्यांची पिछेहाट सुरूच
अगरतळा पालिकेतील सर्व प्रभागांमध्ये तृणमूल काँग्रेसने दुसरे स्थान मिळविले आहे. या निवडणुकीकरता भाकप, फॉरवर्ड ब्लॉक आणि आरएसपीने माकपसोबत आघाडी केली होती. तरीही या आघाडीला दारुण पराभव पत्करावा लागला आहे. काँग्रेसलाही या निवडणुकीत फारशी कामगिरी करता आलेली नाही. तर तृणमूलने या निवडणुकीकरता पूर्ण जोर लावत प्रचाराला मोठे स्वरुप दिले होते.