श्रीकृष्णाला आपल्या आत्मस्वरूपाची बलरामदादा आठवण करून देतात. त्याचवेळी ते रुक्मिणीची समजूत घालतात.
सवेंचि म्हणे रुक्मिणीसी । पावोनिया कृष्णचरणासीं।
विषमबुद्धी तुजपाशी । निजमानवी न धरावी ।।
सुहृद दुर्हृद उदासीन । ऐसे त्रिविध न करी मन ।
सर्वांभूती सदां संपूर्ण । पाहे श्रीकृष्ण सर्वदा ।।
अभद्र व्हावे शिशुपाळासी । कल्याण रुक्मिया वांछिसी ।
हे विषमता तुजपाशी । कृष्ण सुखासी प्रतिबद्धक ।।
म्हणसी शिशुपाळा कृष्णद्वेषी । सर्वदा अभद्र पाहिजे त्यासी
मातेचि दशा रुक्मियासी । तोही कृष्णासी द्वेषित ।।
हा सर्व भूतात्मा हृषिकेशी । ऐशिया द्वेषिती जे कृष्णासी ।
तैशिया दुष्टां सोयरियांसी । भद्र वांछिसी ते अभद्र ।।
ऐशिया सर्वभूतद्वेषियासी । दंडमुंडन ते कल्याण त्यासी ।
ते तूं कल्याण मानिसी । चतुर नव्हेसी निजबोधे ।।
कृष्ण ज्ञानिया चतुर । विनोदरूपे केला उपकार ।
रुक्मियाचा नरक घोर । यमप्रहार चुकविला ।।
कृष्ण युद्धी रुक्मियासी । दंड न करिता खांडमिशांसी।
तरी हा होता रौरवासी । अधः पातासी पैं जाता ।।
कृष्ण सोयरा स्नेहाळू । वपनरूपे अतिकृपाळू ।
केला निजकरे निर्मळू । फेडिला विटाळू द्वेषाचा ।।
या लागी कृष्णे केले ते भद्र । तू का मानितेसी अभद्र ।
कृष्ण ज्ञानियांचा नरेंद्र । वेदा पार न कळेचि ।।
बलरामदादा रुक्मिणीला म्हणाले-रुक्मिणी! तुला कृष्णाचे चरण प्राप्त झाले असतानाही तुझ्या मनात विषमबुद्धी आहे, हे योग्य नव्हे. कृष्णाला मित्र, शत्रू, उदासीन सारे सारखेच आहेत. पण तुझ्या मनात मात्र विषमबुद्धी आहे. तू शिशुपालाचे अकल्याण व्हावे व रुक्मीचे कल्याण व्हावे असे इच्छितेस. शिशुपाल कृष्णाचा द्वेषी आहे. म्हणून त्याचा नाश व्हावा असे तुला वाटते. पण रुक्मीही कृष्ण द्वेषी आहे. त्याची मात्र तशी दशा होऊ नये असेही तुला वाटते. ही विषमता आहे. रुक्मिणी, असे पहा की कृष्णाने दंडण मुंडण करून रुक्मीला शिक्षा केली हे योग्यच केले. कारण त्यामुळे त्याचा नरक चुकला. नाही तर या पापासाठी त्याला नरकात भयंकर यातना भोगाव्या लागल्या असत्या. कृष्ण प्रेमळ व दयाळू असल्याने रुक्मीचा वध न करता त्याने त्याला सौम्य शिक्षा केली. कृष्णाने जे चांगले केले ते वाईट केले असे तू का मानतेस? पापी माणसाला दंड करणे, हे न्यायाचे नाही काय? कृष्ण ज्ञानीयांचा राजा आहे. वेदांनाही त्याचा पार लागत नाही.
दुर्घट मोहो पैं प्राणिया । केली असे कृष्णमाया ।
ब्रह्मादिकां न येचि आया । देवमाया देहबुद्धी ।।
तये देहबुद्धीचे लक्षण । सुहृद दुर्हृद उदासीन ।
त्रिविध त्रिगुण न करी मन । देहाभिमान नुपजवी ।।
नश्वर देह तंव जाणती । देह निमालिया मृत्यू मानिती।
देहसंबंधियां अतिप्रीती । येरा द्वेषिती उपेक्षा ।।
Ad. देवदत्त परुळेकर