विनोद चिखलकर / जोतिबा डोंगर
जोतिबाच्या नावानं चांगभलं, यमाई, चोपडाई, काळभैरवाच्या नावानं चांगभलंच्या गजरात गुलाल, दवणा, हार, फुले, खोबरे वाहून दख्खनचा राजा जोतिबाची चैत्र यात्रा काही मोजक्मयाच पुजारी व देवसेवकांच्या उपस्थितीत भक्तीम व मंगलमय वातावरणात पार पडली. पहिल्यांदाच भाविकांविना व सासनकाठी सोहळय़ाविना ही यात्रा संपन्न झाली. यावेळी महाभिषेक, महापोशाख, धार्मिक विधी, धुपारती, पालखीपूजन, यमाई मंदिरातील विधी करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जोतिबा देवाची चैत्र यात्रा रद्द करण्याचा आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला. मात्र धार्मिक विधी, पूजा, अर्चा, नित्य विधी सुरू ठेवण्यास सांगितले होते. त्यामुळे काही मोजक्मयाच पुजारी व देवसेवकांच्या उपस्थितीत हा चैत्र यात्रेचा धार्मिक सोहळा करण्यात आला.
दरम्यान, पहाटे घंटानाद करून श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेच्या नित्य विधीस सुरूवात करण्यात आली. त्यानंतर तहसीलदार रमेश शेडगे यांच्या हस्ते शासकीय महाभिषेक, महापोषाख व धार्मिक विधी करण्यात आले. त्याचबरोबर नंदी, महादेव, चोपडाई, काळभैरव, यमाई, रामलिंग, दत्त या देवांचीही महापूजा बांधण्यात आली. त्यानंतर धार्मिक विधी करण्यात आले.
दुपारी एक वाजता परंपरेनुसार सर्व भाविकांचे खास आकर्षण असते ते सासनकाही सोहळय़ाचे. यासाठी महाराष्ट्र व कर्नाटकातून मानाच्या 96 व इतर 700 सासनकाठय़ा या सोहळय़ात सहभागी होत असतात. यंदा हा सासनकाठी सोहळा रद्द करण्यात आल्यामुळे यावेळी मंदिर परिसरात भाविकांविना मंदिर परिसर ओस पडला होता.
सायंकाळी साडेपाच वाजता पालखी सोहळय़ाचा धार्मिक विधी मंदिर परिसरात करण्यात आला. त्यानंतर यमाई मंदिरात गेला. त्या ठिकाणी रूढीपरंपरेनुसार विधीवत धार्मिक सोहळा, पूजाअर्चा करण्यात आली. त्यानंतर हा सोहळा श्री जोतिबा देवाच्या मंदिरात आला. यावेळी मंदिर प्रदक्षिणा होऊन पालखी सदरेवर बसवण्यात आली. यावेळी तोफेची सलामी देऊन हा पालखी सोहळा मंडपात आणण्यात आला. त्यानंतर उत्सवमूर्ती श्रींच्या मंदिरात नेण्यात आली.
अन्नछत्र बंद
प्रत्येक वषी भाविकांच्या सेवेसाठी अन्नछत्र विभाग, आरोग्य यंत्रणा, पार्किंग ठिकाणे, दर्शन रांगेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सेवाभावी संस्था, काही संघटना, खाजगी सिक्मयुरिटीगार्ड यांचा ताफा गल्लीबोळातून डोंगर परिसरातून व मंदिर परिसरात दिसत असायचा. परंतु यंदा सर्वच ठिकाणी शुकशुकाट व उदास वातावरण होते.
इतिहासात प्रथमच यात्रा रद्द
जोतिबा डोंगरच्या इतिहासात प्रथमच यंदा चैत्र यात्रा भाविकांविना, सासनकाठी सोहळय़ाविना, गुलाल-खोबरे, खारीक व बंदी नाणी यांच्या उधळणीविना तसेच ना भाविकांचा चांगभलंचा अखंड गजर, ना म्हालदार-चोपदाराची सततची भव्य ललकारी, ना ग्रामास्थ, पुजारी, अबालवृध्द व देवस्थान समितीचे पदाधिकारी यांची चैत्र यात्रेची लगबग. तसेच भाविकांना सूचना देणारा स्पिकरचा ना आवाज अशा वातावरणात चैत्र यात्रा संपन्न झाली. सर्वांचे खास आकर्षण असते ते उंट, घोडा, लवाजमा तसेच पालखी सोहळा व सासनकाठी सोहळा हा सोहळा पाहण्यासाठी, आपल्या डोळय़ात साठवण्यासाठी लाखो भाविकांची धडपड असते. परंतु हा सोहळा रद्द झाल्याने ग्रामस्थ, पुजारी, महिलावर्ग भावनाविवश झाल्या आहेत. आपल्या देवाचा, राजाचा सोहळा होत नसल्याने अनेकांना दुःख अनावर झाले आहे. भाविक तर आतूर आहेत. पण कोरोनाच्या संकटामुळे श्रींचे दर्शन व सोहळा यापासून वंचित रहावे लागत आहे.
चैत्र यात्रा आली की ‘बंदी’ हा शब्द गाजतो
जोतिबा देवाच्या चैत्री यात्रेमध्ये गेल्या सात वर्षांमध्ये शासनाने यात्रेवरील ताण कमी करण्यासाठी प्रयत्न मोठय़ा प्रमाणात सुरू केले होते. प्रथम देवाच्या ‘हत्ती’वर बंदी घालण्यात आली. त्यानंतर उंट या प्राण्यावर बंदी, त्यानंतर सासनकाठी उंची व जाडी कमी करण्यासाठी आदेश काढून बंदी आणली. तसेच जोतिबावर खोबऱयाची वाटी उधळणीवर बंदी व लहान तुकडे उधळण्यास परवानगी तसेच त्यानंतर गुलाल-खोबरे उधळण्यावर बंदी. त्याऐवजी गुलाल-खोबरे दान करावे, अशी सूचना देण्यात आली. यात्रेदिवशी मंदिरात नारळ फोडण्यावर बंदी घालण्यात आली. एकूणच भाविकांच्या प्रथा, भावना न दुखवता काही प्रथांवर बंदी घालून यात्रा सुटसुटीत पार पाडण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते. त्यातच यंद कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जोतिबा यात्रेवर बंदी घालण्यात आली. त्यामुळे सध्या चैत्र यात्रा आणि ‘बंदी’ हा शब्द ग्रामस्थ, भाविक व सर्वत्र गाजत आहे.