वार्ताहर / उचगाव
बेळगाव तालुक्यातील पश्चिम भागात नारळी पौर्णिमेलाच दमदार पावसाला पुन्हा सुरुवात झाल्याने बळीराजा सुखावला आहे. भात रोपांची लागवड कोमेजून जात असतानाच पावसाला प्रारंभ झाल्याने सदर भात पिकाला जीवदान मिळाले आहे. जवळपास पंधरा ते वीस दिवसांपासून पावसाने पाठ फिरविली होती. याच काळात भातरोप लागवडीला जोर आला. अधून मधून येणाऱया तुरळक पावसाच्या सरींनी भातरोप लागवड टिकून होती. या भातरोप लागवड केलेल्या शेतवडीत पाणी साचून राहणे आवश्यक असतानाच पावसाने दडी मारली. उन्हाच्या तडाख्याने भाताची कोवळी रोपे कोमेजून जात असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण असतानाच पुन्हा सोमवारपासून पावसाच्या सरी बरसू लागल्याने जीवदान मिळाल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त होताना दिसत आहेत.
रताळी वेलीला पाऊस पोषक
पश्चिम भाग हा रताळी उत्पादनात अग्रेसर मानला जातो. रताळी वेल लागवड काळात रिमझिम पाऊस होता. मात्र लागवड पूर्ण झाली आणि ऊन पडू लागल्याने सदर पीक यावर्षी वाया जाणार अशी परिस्थिती निर्माण झाली असतानाच दमदार पावसाला सुरुवात झाल्याने सध्या या पिकावरील धोका आता टळला आहे.
याबरोबरच या भागात भुईमूग, मका, जोंधळा, बटाटा, नाचणा, भाजीपाला, सुर्यफूल, मिरची अशी सर्व पिके माळ जमिनीमध्ये खरीप हंगामात घेतली जातात. या सर्वच पिकांना हा पाऊस वरदान ठरला आहे. या बरोबरच उसाच्या पिकाला देखील पाऊस वरदान ठरला आहे.