ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्यात आठवडाभर सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सातारा, रायगड, रत्नागिरीसह अन्य जिह्यात दरडी कोसळणे, भूस्खलन यासारख्या घटना घडल्या आहेत. अशा प्रकारच्या घटनांमध्ये मागील 48 तासात राज्यात 129 नागरिकांचे बळी गेले आहेत. तर काही जण मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले असून, त्यांचा शोध सुरू आहे.
साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील आंबेघर, मिरगाव, ढोकवळे तसेच वाईच्या कोंडवळी व मोजेझोर येथे दरडी कोसळून 27 जण ठार झाले आहेत. रायगडच्या महाड तालुक्यातील तळीये गावात गुरुवारी सायंकाळी दरड कोसळून घरेच्या घरे गाडली गेली. यात 44 जणांचा मृत्यू झाला असून, अद्याप 50 जण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भिती व्यक्त होत असून त्यांचा शोध सुरू आहे. तर 35 जण जखमी असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलादपूर तालुक्यात केवनाळे व सुतारवाडी येथेही दरड कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला. तसेच चिपळूण तालुक्यात पोसरे-बौद्धवाडीत दरड कोसळल्यामुळे 17 जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. राज्यात विविध ठिकाणी दरड कोसळणे, भुस्खलन अशा घटनांमध्ये आतापर्यंत 129 नागरिकांचा बळी गेला आहे.