प्रतिनिधी/ दापोली
तालुक्यातील आडे गावातील सोटेपीर दर्ग्यावर 2-3 दिवसांपूर्वी अज्ञातांनी भगव्या रंगाचे झेंडे लावले. यावरून गावांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी गावातील दोन्ही समाजातील प्रतिनिधींची बैठक घेतली. यामध्ये दोन्ही समाजातील लोकांनी सामंजस्याची भूमिका घेत या घटनेवर पडदा टाकला.
तालुक्यातील केळशीजवळ असणाऱया आडे गावात सोटेपीर बाबा हा प्रसिध्द दर्गा असून तो हिंदू, मुस्लिम व कोळी समाजाचे श्रद्धास्थान आहे. नुकत्याच झालेल्या चक्रीवादळात या दर्ग्याचे नुकसान झाले होते. यामुळे तो दुरुस्त करण्याचा निर्णय मुस्लिम बांधवांनी घेतला. याला गावातील एका समाजाने विरोध केला होता. यानंतर एका समाजाने या दर्ग्याच्या दुरुस्ती कामासाठी देणगी देण्याची इच्छा व्यक्त करत पावतीची अपेक्षा केली. यावरूनही वाद निर्माण झाला होता. पोलिसांनी हे वाद सामोपचाराने मिटवले होते. सामंजस्याची भूमिका घेऊन दर्गा रस्त्यापासून थोडा आत बांधायला घेतला. दर्ग्याचे काम पूर्णत्वास आल्यावर 2 दिवसांपूर्वी अज्ञात इसमाने या दर्ग्यावर भगव्या रंगाचे दोन झेंडे बांधले. यामुळे गावामध्ये तणाव निर्माण झाला.
या प्रकरणी आडे मोहल्ला जमातुल मुस्लिमीनने दापोली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. दर्ग्यावर अज्ञात इसमाने भावना दुखावण्यासाठी झेंडे लावले असून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. गावातील सलोख्याचे संबंध कायम राहण्यासाठी हे झेंडे काढून टाकावेत, अशी मागणी मुस्लिम समाजाने केली.
या प्रार्श्वभूमीवर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून जिह्यातून जादा पोलीस कुमक मागवली. सीआरपीएफच्या जवानांच्या तुकडय़ाही दाखल झाल्या होत्या. मात्र शुक्रवारी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन झेंडे काढले. गावांमध्ये शांतता रहावी, यासाठी पोलिसांच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी दोन्ही समाजांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित केली. बैठकीत दोन्ही समाजातील प्रतिनिधींनी सामंजस्याची भूमिका घेत यापुढे दोन्ही समाज गुण्यागोविंदाने नांदतील, असे सांगितले. यानंतर तणावाच्या पार्श्वभूमीवर ठेवण्यात आलेला पोलीस बंदोबस्त काढून घेण्यात आला.
केळशी संवेदनशील गावांच्या यादीत
काही वर्षांपूर्वी केळशी गावाला आडे गावातून जाणाऱया रस्त्यावर अफजलखान वधाचे फ्लेक्स लावण्यात आले होते. त्यांची अज्ञातांकडून विटंबना करण्यात आल्याने तणाव निर्माण झाला होता. तेव्हापासून केळशी पोलिसांच्या संवेदनशील गावांच्या यादीमध्ये समाविष्ट आहे. दोन समाजात तेढ निर्माण करणारा प्रकार पुन्हा घडल्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.