ऑनलाईन टीम/तरुण भारत
उत्तर प्रदेशात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. उत्तर प्रदेशात सत्ता आणण्यासाठी सर्व कामाला लागले आहेत. भाजप आपली सत्ता कायम राखण्यासाठी रणनीती आखात आहे. तर काँग्रेस आणि इतर पक्ष बाजपला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी प्रयत्न करत आहेत. काँग्रेसने पक्षाचा जाहीरनामा जारी केला आहे. आता बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री मायावती यांनी समाजवादी पक्ष दलित आणि मागासवर्गीयांमध्ये जन्मलेल्या महापुरुषांचा अवमान करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच या दलित, मागासलेल्या समुदायांनी अखिलेश यादव यांच्या पक्षाकडून कोणतीही अपेक्षा करू नये, असेही सांगितले. सपाचे सरकार असताना जातीय द्वेषामुळे राज्यात अनेक संस्था आणि योजनांची नावे बदलण्यात आली होती, असेही त्या म्हणाल्या.
“सपा सुरुवातीपासूनच दलित आणि मागासवर्गीयांमध्ये जन्मलेल्या महान संत, गुरू आणि महापुरुषांचा अवमान करत आहे. त्याचे उदाहरण म्हणजे फैजाबाद जिल्ह्यातून निर्माण झालेला नवा आंबेडकर नगर जिल्हा. त्यांनी याला सुद्धा विरोध केला. भदोही हा संत रविदास नगरमधील एक नवीन जिल्हा आहे आणि त्याचे नाव देखील सपा सरकारने बदलले आहे,” असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.