बेळगाव : दसऱयाची दहा दिवसांची सुटी संपवून गुरुवारपासून शाळा पुन्हा पूवर्वत सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शाळांच्या आवारात विद्यार्थ्यांचा किलबिलाट पहायला मिळत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ऑगस्ट अखेरीस शासनाने 6 वी ते 12 वीपर्यंतचे ऑफलाईन वर्ग सुरू केले होते. त्यानंतर दहा दिवस दसऱयाची सुटी जाहीर झाली होती. आता सुटीनंतर 6 वीपासूनच्या ऑफलाईन वर्गांना पुन्हा प्रारंभ झाला आहे.
काही शाळांतून पहिल्या दिवशी देखील विद्यार्थ्यांची उपस्थिती समाधानकारक होती. कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून शैक्षणिक वर्ष विस्कळीत झाले आहे. यंदा शैक्षणिक वर्षाला उशिराने सुरुवात झाली. त्यामुळे अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट शिक्षकांसमोर आहे. दरम्यान शासनाने यंदा दसरा सुटीत कपात करून दहा दिवस सुटी दिली होती. शासनाच्या नियमानुसार कोरोना नियमांचे पालन करून दसरा सुटीनंतर शाळा पुन्हा एकदा गजबजल्या. खबरदारी म्हणून शाळांतून सामाजिक अंतर आणि सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात येत आहे.
मध्यान्ह आहाराला सुरुवात
कोरोनामुळे साधारण मागील दोन वर्षांपासून बंद असलेल्या मध्यान्ह आहाराला दसरा सुटीनंतर पहिल्या दिवसापासूनच प्रारंभ झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला. मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्यान्ह आहार बंद करून त्या बदल्यात रेशनचा पुरवठा केला जात होता. मात्र आता पूर्ववतपणे अक्षरदासोह योजनेंतर्गत मध्यान्ह आहाराला सुरुवात झाली आहे. त्यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांच्या दुपारच्या जेवणाचा प्रश्न देखील सुटला आहे.
येत्या सोमवारपासून वाढणार किलबिलाट
येत्या सोमवारपासून पहिली ते पाचवीच्या ऑफलाईन वर्गांना प्रारंभ होणार आहे. यापूर्वी 6 वी ते 12 वीपर्यंतच्या वर्गांना प्रारंभ झाला आहे. मात्र आता पहिलीपासूनच्या वर्गांना प्रारंभ होणार असल्याने पुन्हा किलबिलाट वाढणार आहे. शाळा सुरू होणार असल्या तरी शिक्षकांना कोरोना नियमांचे पालन करूनच अध्यापन करावे लागणार आहे. शिवाय विद्यार्थ्यांची वर्गातील हजेरी देखील सक्तीची राहणार नाही.