कणकवली गडनदीपुलानजीकच्या धोकादायक वळणावर अपघात : ट्रकमधील स्टेजचे साहित्य अंगावर पडून दोन कामगारांसह चालक, क्लीनर जखमी : रस्त्यालगत पार्किंग केलेल्या दुचाकींचेही नुकसान
कणकवली:
चालकाचे नियंत्रण सुटल्याने दिल्लीहून गोव्याकडे स्टेज साहित्याची वाहतूक करणारा ट्रक कणकवली – वागदे सीमेवर असणाऱया गडनदी पुलानजीकच्या अवघड वळणावर कलंडला. त्यामुळे ट्रकमध्ये मोठय़ा प्रमाणात असलेले साहित्य खाली कोसळून त्याचा मार बसून महामार्गानजीक शेड बांधणीचे काम करणारे अजय नरहरी शिंदे (47, गोठणे) व ओंकार भास्कर कदम (22, कणकवली) हे दोन कामगार जखमी झाले. तर ट्रकचा क्लिनर महम्मद रजाक अश्रद खान (42) व चालक अश्रत फजलइलाही खान (45, दोघेही रा. जि. असदर, राजस्थान) यांनाही दुखापती झाल्या. जखमींना उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी 4.45 च्या सुमारास घडला.
अपघाताच्या ठिकाणी काही स्टॉलधारकही आहेत. सुदैवाने नियंत्रण सुटलेला ट्रक त्या स्टॉलच्या दिशेने न गेल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, ट्रक कलंडल्यानंतर आतील साहित्य महामार्गानजीक पार्किंग करण्यात आलेल्या काही दुचाकींवर कोसळले. काही दुचाकी सामानाखाली अडकल्या होत्या. नागरिकांच्या प्राथमिक पाहणीत चार दुचाकी दिसून आल्या.
दिल्लीहून गोव्याला जात होता ट्रक
ट्रकचालक अश्रत खान हा दहाचाकी ट्रक (डीएल-1/जीसी-4352) घेऊन दिल्ली येथून गोव्याला जात होता. ट्रकमध्ये स्टेजबांधणीचे साहित्य गच्च भरलेले होते. यात लाकडी व लोखंडी साहित्याचा समावेश होता. ट्रक गडनदीचे पूल पार करून पुढे आला असता पूल संपल्यावर असलेल्या धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे ट्रक थेट महामार्गाच्या डाव्या बाजूला येत कलंडला.
तिघांना दुखापती
ट्रक कलंडल्यानंतर मागील हौद्यात गच्च भरलेले सर्व सामान खाली कोसळले. याच ठिकाणी शेड बांधणीचे काम सुरू आहे. तेथील कामगार अजय शिंदे आणि ओंकार कदम यांच्या अंगावर काही सामान पडले. यात अजय यांच्या उजव्या हाताच्या मनगटाला व तेंडाला दुखापत झाली. तर ओंकार यांनाही मुका मार बसला. अपघातानंतर क्लिनर महम्मद खान हा ट्रकमध्येच अडकून पडला होता.
नागरिकांची धाव
अपघाताची माहिती समजताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. भाजप शहराध्यक्ष अण्णा कोदे, महेश सावंत, संकेत नाईक, नितीन म्हापणकर, विलास गांवकर, भास्कर राणे आदींनी जखमींना बाजूला केले. नागरिकांनी ट्रकमध्ये अडकलेल्या क्लिनर महम्मद खान यालाही बाहेर काढले. तिन्ही जखमींना खासगी वाहनातून येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ट्रकचा फटका दुचाकींनाही
गडनदी पुलाच्या पुढील भागात काही स्टॉल झाले आहेत. त्यामुळे तेथे अनेक प्रवासी चहा पिण्यासाठी थांबतात. अपघातसमयीदेखील घटनास्थळी काही दुचाकी उभ्या होत्या. ट्रकमधून पडलेले सामान थेट दुचाकींवर कोसळले. त्यामुळे काही दुचाकी साहित्याखाली अडकल्या होत्या. नागरिकांच्या पाहणीत चार दुचाकी दिसून आल्या.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. अपघाताची खबर वागदे गावचे पोलीस पाटील सुनील सखाराम कदम यांनी दिली. त्यानुसार अपघाताची पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.
वळण धोकादायक
गडनदी पुलानजीक असणारे ते धोकादायक वळण अगदी पूर्वीपासूनच अपघातांना निमंत्रण देणारे ठरत होते. महामार्ग चौपदरीकरण होत होते, त्यावेळी तरी हे वळण नष्ट होऊन रस्ता सरळ होईल, अशी नागरिकांची अपेक्षा होती. पण, चौपदरीकरणात रस्त्याचे रुंदीकरण वाढले असले तरी वळण ‘जैसे थे’च राहिले. परिणामी येथे कधी ना कधी अपघात घडणार, याचा अंदाज नागरिकांना होताच. भविष्यात येथे मोठा अपघात घडून जीवितहानी होऊ नये, याची काळजी घेण्याची गरज आहे.