दहावीचा इंग्रजी पेपर ठरला वादग्रस्त : गोवेकर, सरकार, पंचायतींची बदनामी : पोर्तुगीज धार्जिण्या प्रश्नाने संताप : गोवा भ्रष्टाचारी असल्याचे चित्र
प्रतिनिधी / पणजी
गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळातर्फे इयत्ता दहावीच्या शनिवारी घेण्यात आलेल्या इंग्रजी प्रश्नपत्रिकेत विद्यार्थ्यांना विचारण्यात आलेल्या वादग्रस्त प्रश्नामुळे सरकारची चारही बाजूने कोंडी झाली आहे. यातून सरकारच्या भ्रष्टाचारावर जणू काही शिक्कामोर्तबच करण्यात आलेले आहे. या प्रकरणाने राज्यात खळबळ माजली असून गोवा बोर्डाने विरोधकांच्या हाती आयतेच कोलीत दिले आहे. विरोधकांनी सरकारवर खरपूस टीका केली आहे. त्याचबरोबर भाजपमधील अनेक दिग्गज नेत्यांनीही या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून संपूर्ण परीक्षा झाल्यानंतरच काय तो निर्णय होईल, असे ते म्हणाले.
इयत्ता दहावीची परीक्षा गोव्यात शनिवारपासून सुरू झाल्यानंतर पहिल्याच इंग्रजी पेपरमधून सरकारचे वाभाडेच निघाले. प्रश्न क्रमांक 7 सी (4) यामध्ये गोव्यातील भ्रष्टाचाराचा गोमंतकीयांवर परिणाम झालेला आहे, या एका वाक्याने सरकारची तारांबळ उडाली आहे.
पुढील नियोजनासाठी पोर्तुगीज पासपोर्ट…?
प्रश्न क्र. 7 (डी) यामध्ये रायसन नावाची एक व्यक्ती केदन हिला तुमचे पुढील नियोजन काय रे मित्रा, असा प्रश्न करतो. त्यावर केदन उत्तर देत असताना आपण पोर्तुगीज पासपोर्टसाठी अर्ज केलेला आहे आणि गोव्यात रोजगारासाठी फारच कमी संधी उपलब्ध आहे, असे सांगतो. यावर रायसन जे उत्तर देतो त्याच्यामुळे फार मोठी खळबळ माजलेली आहे. रायसन म्हणतो तू एक अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे. गोव्यामध्ये पैसा आणि वशिला लावल्याशिवाय गोमंतकीयांना रोजगार मिळणे कठीण आहे. या एकाच वाक्याने सरकारचे पितळ उघडे पडले आहे.
पंचायतींच्या अधिकारांसंबंधी सर्वेक्षणाचा प्रश्न
या व्यतिरिक्त प्रश्न क्र. 8 (ए) यामध्ये आणखी एक भन्नाट कल्पना मांडण्यात आलेली आहे. त्यात गोव्यातील पंचायतींच्या अधिकारांवर सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये पंचायतींना जादा अधिकार देणे योग्य आहे काय, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यात चार उत्तरे मिळाली आणि त्यात एका वर्तुळामध्ये त्याचे चार भाग करण्यात आले आहे. त्याध्ये सर्वात कमी ए – मध्ये गावच्या विकासासाठी देणे योग्य. बी- मर्यादित अधिकार देणे योग्य, सी- या उत्तरासाठी संपूर्ण वर्तुळातील अर्धा भाग दाखविण्यात आला आहे. त्याचे उत्तर असे आहे, मुळीच अधिकार देण्यात येऊ नये, कारण पंचायत सदस्य अधिकारांचा गैरवापर करतात. डी – यासाठी थोडी कमी जागा दाखविण्यात आलेली आहे. त्यामध्ये जिथे गरज आहे तिथेच अधिकार देण्यात यावे, या संपूर्ण विषयासाठी 3 गुण देण्यात आले असून 80 शब्दात त्यावर भाष्य करावे, असे म्हटले होते. या प्रश्नामध्ये कुठेही कपोलकल्पीत असे म्हटलेले नव्हते. किमान त्यामध्ये गोव्याचे तरी नाव असता कामा नये होते. कारण अशा प्रकारचे सर्वेक्षणही झालेले नाही. जरी काही पंचायत सदस्य अधिकाराचा गैरवापर करत असले तरी देखील सरसकट सर्वांनाच यात गोवणे हे चुकीचे ठरते आणि अशातरेचा प्रश्न, तो देखील सरकारी मंडळाने विचारावा, यामुळे एका नव्या वादाला राज्यात सुरुवात झाली आहे.
विरोधी पक्षांसाठी हे आयतेच कोलीत
दिवसभर या प्रकरणाने राज्यात सर्वत्र चर्चेचा विषय ठरला. विरोधी पक्षांसाठी हे आयतेच कोलीत सापडले असून आता हा विषय फार गंभीरपणे विरोधकांनी हाती घेतला आहे. त्याचबरोबर प्रश्न क्र. बी – पोर्तुगीज संदर्भात केलेली टिपण्णी ही खरे तर गोव्याची बदनामीच ठरत आहे. त्यामुळेच हा विषय आता सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी देखील एक मोठा विषय करून ठेवला आहे.
या कृत्याची मला शरम वाटते :लक्ष्मीकांत पार्सेकर
माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी हे ज्या शिक्षकाने कृत्य केले असेल त्याबद्दल आपल्याला अत्यंत खेद होतो आणि खरोखरच शरम वाटते अशा शब्दात झालेल्या प्रकाराची निर्भत्सना केली. या प्रकरणाची शिक्षणमंत्र्यांनी गंभीर दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. शिक्षक या नात्याने आपण असा प्रकार गोव्यात कधीही पाहिला नव्हता, असे ते म्हणाले.
अत्यंत खेदजनक प्रकार – राजेंद्र आर्लेकर
भाजप नेते तथा माजी मंत्री राजेंद्र आर्लेकर यांनी या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी ट्विटरद्वारे या प्रकारचा निषेध व्यक्त केला आहे. कुणी तरी पोर्तुगीज धार्जिण्यांनी गोवा सरकारची बदनामी करण्यासाठी हा कट रचलेला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, असे त्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांनी संबंधितांनवर कारवाई करावी : सिद्धार्थ कुंकळकर
भाजपर नेते सिद्धार्थ कुंकळकर यांनी या प्रश्नांना जोरदार आक्षेप घेतला आहे. गोव्याची बदनामी करण्याचा कुटील डाव उघड झाला आहे. दुर्देवाने हे प्रश्न विद्यार्थ्यांना विचारले जातात. या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
प्रकरणाची सविस्तर चौकशी करणार : भगिरथ शेटये
गोवा शालांत मंडळाचे सचिव भगिरथ शेटये यांच्याशी संपर्क साधला असता, जे काही तथाकथित वादग्रस्त प्रश्न असतील त्या प्रकरणाची सविस्तर चौकशी केली जाईल. तथापि हे प्रश्न म्हणजे शालांत परीक्षा मंडळाचे धोरण नव्हे आणि ज्या कोणी हे प्रश्न विचारले असतील त्याची चौकशी आम्ही निश्चितच करणार आहोत. भविष्यात असे प्रश्न विचारले जाऊ नये यासाठी मंडळाला आता आपल्या धोरणात अजून काही बदल करावे लागतील. त्याचबरोबर पेपर सेटर्स जेव्हा प्रश्नपत्रिका तयार करतात तेव्हा प्रत्येक प्रश्नपत्रिका गोवा बोर्डाचे अध्यक्ष किंवा सचिव देखील बघू शकत नाही. इंग्रजी विषयाच्या प्रश्न पत्रिकेत काही प्रश्नांवर आक्षेप घेऊन त्या संदर्भात मंडळाकडे अनेकांनी सूचना केली, त्याची दखल घेतली आहे, असे ते म्हणाले.
जे काही होईल, ते परीक्षा पूर्ण झाल्यांनतरच – मुख्यमंत्री
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सांवत यांच्याशी संपर्क साधला असता मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी कानावर हात ठेवले. सध्या राज्यात दहावीची परीक्षा सुरू आहे. माझ्याकडे इंग्रजी विषयाच्या प्रश्न पत्रिकेबाबत अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. परीक्षा काळ असल्यामुळे आपल्याला वातावरण बिघडू द्यायचे नाही. तथापी संपूर्ण परीक्षा संपल्यानंतरच आपण आपली प्रतिक्रिया देऊ आणि त्याचबरोबर योग्य तो न्याय निवाडा केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.