जनहित याचिका दाखल : कोरोना परिस्थितीमुळे परीक्षेला विरोध
प्रतिनिधी /बेंगळूर
कोरोना परिस्थितीतही दहावी परीक्षा अत्यंत नियोजनबद्ध आणि सुरक्षिततेमध्ये पार पाडण्यासाठी राज्य सरकार सज्ज झाले आहे. 19 आणि 22 जुलै रोजी परीक्षा घेण्यासाठी सर्व प्रकारची तयारीही करण्यात आली असून शिक्षण खात्यातील वरिष्ठ अधिकारी परीक्षा केंद्रांची पाहणी करीत आहेत. दरम्यान, बारावीप्रमाणे दहावीची परीक्षाही रद्द करावी, अशी मागणी करून सिंग्रेगौडा यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
कोरोनामुळे राज्यातील बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. याप्रमाणेच विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक सुरक्षेचा विचार करून दहावीची परीक्षाही रद्द करण्यात यावी, अशी मागणी सिंग्रेगौडा यांनी याचिकेमध्ये केली आहे. कोरोना परिस्थितीत परीक्षा केंद्रांमध्ये विद्यार्थ्यांना पाठविणे योग्य नाही. अलीकडेच काही राज्यांनी दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. सीबीएसई बोर्डानेही परीक्षा रद्द केली आहे. असे असताना राज्य सरकारने परीक्षा घेण्यासाठी पुढे येणे योग्य नाही, असेही त्यांनी याचिकेत म्हटले आहे.
सदर याचिकेवर लवकरच सुनावणी होणार असून न्यायालय कोणता निर्णय घेईल, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
19 जुलै रोजी समाज, विज्ञान आणि गणित विषयांचा एकत्रित पेपर होणार आहे. तर 22 जुलै रोजी भाषा विषयांचा पेपर होणार आहे. काही विद्यार्थ्यांनी परीक्षेचे हॉलतिकिटही मिळविले आहेत. परीक्षेच्या वेळापत्रकाची घोषणा झाल्यानंतरही भाजपचे विधानपरिषद सदस्य एच. विश्वनाथ यांनीही दहावीची परीक्षा घेण्यास विरोध दर्शविला आहे. मात्र, राज्य सरकार मागील वर्षाप्रमाणे यंदा देखील यशस्वीपणे परीक्षा घेण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. कोरोना परिस्थितीमुळे यावेळी प्रश्नपत्रिकेच्या स्वरुपात बदल करून केवळ दोन दिवस परीक्षा घेतली जाणार आहे.
परीक्षेवेळी विद्यार्थ्यांसाठी बसेसची व्यवस्था : सवदी
दहावी परीक्षेला हजर होणाऱया विद्यार्थ्यांना परीक्षा केंदावर येण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि परिवहनमंत्री लक्ष्मण सवदी यांनी दिली आहे. दहावी विद्यार्थ्यांना परीक्षा कालावधीत पुरेशा बसेस सोडण्याची विनंती शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी फोनद्वारे केली होती. आपण आणि शिक्षणमंत्री सुरेशकुमार एकत्रपणे बैठक घेऊन परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांसाठी बसेसची व्यवस्था करण्याबाबत चर्चा करून निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले.
परीक्षेसाठी सज्जता…
दहावी परीक्षा प्रक्रियेत सहभागी होणारे सर्व अधिकारी, शिक्षक आणि इतर कर्मचाऱयांचे लसीकरण करून अत्यंत सुरक्षित वातावरणात परीक्षा घेण्यासाठी तयारी केली जात आहे. यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
– एस. सुरेशकुमार, शिक्षणमंत्री ,प्राथमिक-माध्यमिक शिक्षण खाते