ऑक्टोबरच्या मध्यातही जिल्हय़ात मुसळधार : गतवर्षीच्या तुलनेत अधिक पावसाची नोंद
प्रतिनिधी / ओरोस:
सिंधुदुर्गात सद्यस्थितीत पडत असलेल्या पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मागील 14 दिवसात 385 गावांमधील 5284 हेक्टर क्षेत्रावरील 10 हजार 491 शेतकऱयांच्या पिकाची नासाडी झाल्याचा प्राथमिक अंदाज राज्य शासनाच्या कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
यंदा चांगला पाऊस झाल्याने भातशेतीही चांगली झाली होती. मात्र, कापणीच्या तोंडावरच या महिन्यात झालेल्या पावसाने शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे. एक ऑक्टोबरपासून सातत्याने कमी-जास्त पाऊस झाला आहे. काहीवेळा अतिवृष्टी तर काहीवेळा वादळी वाऱयासह अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे कृषी विभागाने नुकसान झालेल्या शेतीक्षेत्राचा प्राथमिक अहवाल विभागीय कृषीसह संचालकांना सादर केला आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे होणाऱया पावसाचा फटका मागील दोन दिवसांपासून सिंधुदुर्गलाही बसला आहे. जिल्हय़ाच्या अनेक भागात मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. कणकवली तालुक्यातील कोंडये येथील मयुरी मंगेश तेली (36) या महिलेचा या अवकाळी पावसाने बळी घेतला आहे. 13 ऑक्टोबरला ती ओहोळाला आलेल्या पुराच्या पाण्यातून वाहून गेली होती.
बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या 24 तासात जिल्हय़ात 33.77 मि.मी.च्या सरासरीने 270.20 मि.मी. पाऊस झाला. तर 1 जूनपासून 14 ऑक्टोबरपर्यंत 4799.58 मि.मी.च्या सरासरीने 38396.65 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
गतवर्षी 14 ऑक्टोबरला 4431.62 मि.मी.च्या सरासरीने 35453 मि.मी. पाऊस झाला होता. या तुलनेत यावर्षी 367.96 मि.मी.च्या सरासरीने 2943.65 मि.मी. एवढा जादा पाऊस पडला आहे.
3 हजार 195 जणांकडून पीकविमा
भातशेतीच्या नुकसानीपासून संरक्षणासाठी यावर्षी जिल्हय़ातील 3 हजार 195 शेतकऱयांनी विमा संरक्षण घेतले आहे. कापणीपश्चात पिकाचे नुकसान झाल्यास संबंधित विमाधारक शेतकऱयाला विमा कंपनीकडून नुकसान भरपाईची रक्कम दिली जाणार आहे. मात्र, उर्वरित शेतकऱयांना नुकसान भरपाईसाठी शासनाच्या मदतीची वाट पाहावी लागणार आहे.