प्रतिनिधी/ दापोली
चिपळूण येथून उत्तरप्रदेशला जाण्यासाठी प्रशासनाने रेल्वेची व्यवस्था केल्याने बुधवारी 300 उत्तर भारतीय कामगारांची दापोली प्रशासनाने एसटीच्या माध्यमातून चिपळूणला रवानगी केली. तेथून हे कामगार उत्तरप्रदेशला रवाना झाले.
लॉकडाऊनमुळे झारखंड, ओरिसा, बिहारसह उत्तर प्रदेश येथून शहरात दाखल झालेले अनेक मजूर, कामगार अडकून पडले होते. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर या लोकांच्या हाताला काम मिळेनासे झाले. यामुळे झारखंड, ओरिसा, पश्चिम बंगाल, बिहार आदी राज्यातील कामगारांची प्रशासनाने त्यांच्या गावी रवानगी केली. मात्र उत्तरप्रदेशमधील कामगार त्यांच्या प्रशासनाच्या आडमुठे धोरणामुळे अडकून पडले होते. अखेर या कामगारांसाठी चिपळूण येथून रेल्वेची व्यवस्था करण्यात आल्याने त्यांची घरवापसी करण्यात आली. दापोली तालुक्याच्या विविध भागात एसटी पाठवून या सर्व उत्तरभारतीयांना बसस्थानकावर एकत्र करण्यात आले. यात हर्णे येथील कामगार मोठय़ा प्रमाणात होते. या सर्व कामागारांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना योग्य ते अंतर राखत गाडीत बसवण्यात आले. त्यांना बिस्कीट पुडे व पाण्याच्या बाटल्याही पुरवण्यात आल्या.