जून महिन्याची पुनरावृत्ती होते की काय, ग्रामस्थांसमोर प्रश्न
वार्ताहर/ मौजे दापोली
गेल्या दोन दिवसांपासून रत्नागिरी जिह्यात पावसाचा जोर कायम आहे. त्यातच आता चक्रीवादळ हे अरबी समुद्रातून केळशी मार्गाने येत असल्याचे वृत्त समजताच तालुक्यातील समुद्रालगत राहणाऱया रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अजूनही जून महिन्यात झालेल्या चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेले समुद्रालगतचे ग्रामस्थ अद्याप सावरलेले नाहीत. त्यातच पुन्हा केळशी मार्गे अर्थात समुद्राच्या दिशेने चक्रीवादळ येत असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा मोठय़ा संकटात सापडतो की काय, असा प्रश्न दापोलीतील समुद्रालगत राहणाऱया नागरिकांना पडला आहे.
दापोलीत बुधवारी सायंकाळपासून विजांसह जोरदार पाऊस झाला. हा पाऊस गुरुवारी सकाळपर्यंत सुरू होता, परंतु त्यानंतर पाऊस मध्येच थांबला होता. गुरुवारी दापोली तालुक्यात पाऊस विश्रांती घेत पडत असला तरी 48 तास हे रत्नागिरी जिह्याला रेड अलर्ट करण्यात आले असल्याने दापोलीकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी झालेल्या पावसासंदर्भात दापोली तहसील कार्यालयाकडे चौकशी केली असता अद्याप कोणत्याही आपत्तीची नोंद करण्यात आलेली नसल्याचे समोर आले.