तीन महिन्यात पाईपलाईनचे काम पूर्ण होणार
दिघंची/प्रतिनिधी
अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली दिघंची येथील निंबाळकर तलावाकडे येणाऱ्या टेंभू योजनेच्या बंदिस्त पाईपलाईनचे काम अखेर सुरू झाले आहे. आटपाडी तालुक्याचे नेते तानाजीराव पाटील यांच्या उपस्थितीत कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी दिघंचीचे सरपंच अमोल मोरे उपस्थित होते. आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली आटपाडी तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शिवारात पाणी नेण्याचा संकल्प आहे. मागील वर्षी दिघंची येथील निंबाळकर तलावाकडे येणाऱ्या बंदिस्त पाईपलाईनचे काम दहा किलोमीटर एवढे झाले आहे. उर्वरित कामाचा शुभारंभ शनिवारी करण्यात आला असून सुमारे तीन महिन्यात बंदिस्त पाईपलाईनचे काम निंबाळकर तलावापर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर परिसरातील बंधारे ,पाझर तलाव टेंभू योजनेतून भरण्यासाठी उपायोजना केल्या जाणार आहेत.
मागील वर्षी दिघंचीमध्ये टँकर ने पाणीपुरवठा सुरू होता तीव्र दुष्काळ दुष्काळी परिस्थितीमध्ये टेंभू योजनेचे पाणी निंबाळकर तलावामध्ये आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागली होती. दिघंची चे सरपंच सरपंच अमोल मोरे यांच्यासह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, शेतकरी ,ग्रामस्थ या सर्वांनी वेळप्रसंगी रात्री पहारा देऊन पाणी दिघंची निंबाळकर तलावात आणले होते. त्यानंतर दुसऱ्यांदा देखील पाणी निंबाळकर तलावात आणण्यासाठी प्रयत्न करावे लागले. तीन महिन्यात उर्वरित पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यास पाणी थेट निंबाळकर तळ्यात येणार असून पुढील आवर्तन सुरू सुरु झाल्यानंतर टेंभू योजनेचे पाणी विना-अडथळा दिघंची मध्ये येणार आहे.