सरपंच अमोल मोरे यांचा उपोषणाचा इशारा
दिघंची/प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठी विकास सोसायटी असणाऱ्या दिघंची विकास सोसायटी मध्ये शेतकऱ्यांनाच अडचणीत आणण्याचा प्रकार घडत असल्याचा आरोप दिघंचीचे सरपंच अमोल मोरे यांनी केला आहे. अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा लाभांश वाटप देखील करण्यात आलेला नाही. तसेच अनेक उत्पन्नाची साधने असताना देखील सभासदांना न्याय मिळत नाही. त्यामुळे सर्व गोष्टी पारदर्शकपणे गावासमोर व सभासदांसमोर न मांडल्यास उपोषणाचा इशारा दिघंची चे सरपंच अमोल मोरे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात सरपंच अमोल मोरे यांनी म्हटले आहे की, सोसायटीचे संस्थापक चेअरमन हयात असताना त्यांनी वार्षिक सभासदांना प्रामाणिकपणे न्याय दिला. परंतु त्यानंतर शेतकरी सभासदांना लाभांश वाटप करण्यात आलेला नाही. याउलट शेतकरी अडचणीत असताना पिक कर्ज मंजूर करण्यासाठी शेतकऱ्यांकडून पैशाची मागणी केली जात आहे. शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक सोसायटी मधून केली जात आहे. दुष्काळ, अवकाळी व त्यानंतर कोरोना महामारीमुळे आधीच अडचणीत असलेला शेतकरी अजून अडचणीत सापडला आहे. त्याचा गैरफायदा सोसायटी चालकांकडून घेतला जात असल्याचा गंभीर आरोप सरपंच अमोल मोरे यांनी केला आहे.
दिघंची विकास सोसायटी चा स्वतःचा पेट्रोल पंप आहे. तो चांगल्या पद्धतीने चालतो. परंतु त्याचा फायदा शेतकरी सभासदांना व सोसायटीला न होता त्याचा फायदा फक्त एका कुटुंबाला होत आहे. कोणत्या नियमानुसार व निकषानुसार ह्या पंपाचा फायदा त्या कुटुंबाला मिळतो याची माहिती लेखी स्वरूपात सोसायटीने उपलब्ध करून द्यावी. अशी मागणी देखील सरपंच अमोल मोरे यांनी केली आहे. शेतकऱ्यांना कोणतीही ही अडवणूक न करता पिक कर्ज दिले पाहिजे व सभासदांना लाभांश वाटप झाला पाहिजे. अन्यथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था आटपाडी येथे सभासदांसोबत उपोषणाला बसण्याचा इशारा सरपंच अमोल मोरे यांनी दिला आहे.