ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. मागील चोवीस तासात 3890 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यातच दिलासादायक बाब म्हणजे बुधवारी एका दिवसात 4161 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
ते म्हणाले, राज्यात दुसऱ्यांदा सर्वाधिक रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. याआधी 29 मे रोजी 8381 रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. आता पर्यंत 73 हजार 792 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात एकूण 62,354 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
बुधवारी सोडण्यात आलेल्या 4161 पैकी मुंबई मंडळात 3530, पुणे मंडळात 355, नाशिक मंडळात 139, औरंगाबाद मंडळ 21, कोल्हापूर मंडळ 24, लातूर मंडळ 7, अकोला मंडळ 26, नागपूर मंडळातील 59 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 51 टक्के आहे.
सध्या राज्यात 5 लाख 57 हजार 948 लोक होम क्वारंटाइन तर 33 हजार 581 जण संस्थात्मक क्वारंटाइन आहेत, असे टोपे म्हणाले.