नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतातील बहुतांश राज्यांमध्ये शनिवारी भूकंपाचे धक्के जाणवले. याची तीव्रता 3.4 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. या भूकंपामुळे सुमारे 54 सेकंद धक्के जाणवले. यापूर्वी बुधवारीही येथे भूकंपाचे धक्के जाणवले होते. या नैसर्गिक आपत्तीचे केंद्र नेपाळमध्ये होते. दिल्ली, एनसीआर, गाझियाबाद आणि लगतच्या भागात शनिवारी संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. तर उत्तराखंडमध्ये शनिवारी दुपारी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घरातून आणि कार्यालयातून बाहेर आले. जीवितहानी किंवा मालमत्तेच्या नुकसानीची कोणतीही माहिती तातडीने उपलब्ध होऊ शकली नाही. तथापि, आठवडाभरात दुसऱयांदा बसलेल्या या धक्क्यांमुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे.