फायनलचा पहिला मानकरी ठरणार, आयपीएल टी-20 लीग स्पर्धेत आज पहिली क्वॉलिफायर लढत, उद्या एलिमिनेटरमध्ये आरसीबी-हैदराबाद आमनेसामने
वृत्तसंस्था / दुबई
आयपीएल-13 हंगामात अंतिम फेरीतील पहिला मानकरी कोण असेल, हे आज (दि. 5) होणाऱया पहिल्या क्वॉलिफायर लढतीच्या माध्यमातून स्पष्ट होईल. मुंबई इंडियन्सची महत्त्वाकांक्षा सफल होईल की दिल्लीची जिद्द, हे देखील आजच अधोरेखित होईल. यंदा साखळी फेरीचा रोमांच क्रिकेट वर्तुळाला अस्सल, दर्जेदार खेळाची पर्वणी देऊन गेल्यानंतर आता प्ले-ऑफमधील उत्कंठा आणखी शिगेस पोहोचल्यास त्यात आश्चर्याचे कारण असणार नाही. आजच्या पहिल्या क्वॉलिफायर लढतीला भारतीय प्रमाणवेळेनुसार, सायंकाळी 7.30 वाजता सुरुवात होईल.
यंदा साखळी फेरीत मुंबई इंडियन्सचा संघ जरुर अव्वल ठरला. पण, मंगळवारी शेवटच्या साखळी सामन्यात सनरायजर्स हैदराबादविरुद्ध त्यांना धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. प्ले-ऑफमधील स्थान पूर्वीच निश्चित झाले असल्याने मुंबईने त्या लढतीत बुमराह, बोल्ट आदी दिग्गज खेळाडूंना खेळवले नव्हते.
यंदा पहिल्यावहिल्या जेतेपदाच्या अपेक्षेत असलेल्या दिल्ली कॅपिटल्सचा संघ आरसीबीचा 6 गडी राखून फडशा पाडत दुसऱया स्थानी झेपावण्यात यशस्वी ठरला. सलग 4 पराभवाची अपयशी शृंखला त्यांनी येथे खंडित केली, हे त्यांच्यासाठी विशेष महत्त्वाचे ठरले. दुसरीकडे, रोहित शर्माचे पुनरागमन हे मुंबई इंडियन्सचे बलस्थान ठरु शकते. रोहितला धोंडशिरेच्या दुखापतीमुळे सलग 4 सामन्यात खेळता आले नाही. नंतर त्याने हैदराबादविरुद्ध शेवटच्या साखळी सामन्यात पुनरागमन केले. पण, तो स्वस्तात बाद झाला होता.
विद्यमान विजेते मुंबई इंडियन्सची फलंदाजी भक्कम आहे तर गोलंदाजीतही त्यांचा हात धरणारा दुसरा संघ नाही. पण, याच संघाच्या फलंदाजांनी सनरायजर्स हैदराबादविरुद्ध अक्षरशः लोटांगण घातले होते, हे दुर्लक्षून चालणार नाही. मुंबईच्या गोलंदाजांना देखील मागील लढतीत जणू ‘वेक-अप कॉल’ मिळालेला आहे. यापासून ते बोध घेतील का, हे आजच्या लढतीत दिसून येईल.
दिल्लीचा भर एक-दोन फलंदाजांवरच!
दिल्लीची मध्यफळी म्हणावी तितकी भक्कम नाही आणि एक-दोन फलंदाजांवरच त्यांचा अधिक भर असल्याचे दिसून आले आहे. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सचे आघाडी फळीतील फलंदाज सातत्याने गोलंदाजांवर बरसत आले असून युवा फलंदाज इशान किशन (428 धावा), अनुभवी क्विन्टॉन डी कॉक (443) यांनी त्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. विराटच्या नजरेला नजर भिडवण्याची धमक दाखवणारा सुर्यकुमार यादव देखील 410 धावांसह उत्तम बहरात आहे. षटकार खेचण्यासाठी अधिक ओळखल्या जाणाऱया हार्दिक पंडय़ा (241 धावा), केरॉन पोलार्ड (259) व कृणाल पंडय़ा (95) यांनीही समयोचित फटकेबाजी केली आहे.
मुंबईने हैदराबादविरुद्ध साखळी सामन्यात जसप्रित बुमराह (23 बळी) व ट्रेंट बोल्ट (20) यांना विश्रांती दिली होती. फिरकीपटू राहुल चहर (15 बळी), कृणाल पंडय़ा (5 बळी) यांना मागील लढतीत झालेली धुलाई विसरावी लागेल.
दिल्लीला सलामी फॉर्मची चिंता
या महत्त्वपूर्ण लढतीला सामोरे जाताना दिल्ली कॅपिटल्सला सलामी जोडीच्या खराब फॉर्मची प्रामुख्याने चिंता आहे. पृथ्वी शॉ (228 धावा) व ऋषभ पंत (282) यांना अद्याप अपेक्षा पूर्ण करता आलेल्या नाहीत.
शिमरॉन हेतमेयर (138) व मार्कस स्टोईनिस (249) या विदेशी खेळाडूंवरच त्यांना अधिक अवलंबून रहावे लागले आहे. कर्णधार श्रेयस अय्यरला (421 धावा) येथे आणखी आक्रमणावर भर द्यावा लागेल.
गोलंदाजीत रबाडा (25 बळी) व नोर्त्जे (19 बळी) अव्वल कामगिरी साकारत आले आहेत. अश्विन व अक्षर यांनी प्रतिस्पर्ध्यांना मोकळा श्वास घेऊ दिलेला नाही. यापूर्वी, दोन्ही साखळी सामन्यात मुंबईने दिल्लीपेक्षा सरस खेळ साकारला. पण, रोहित शर्माच्या दृष्टीने हे दोन्ही निकाल आता इतिहासजमा आहेत आणि विजय खेचून मुसंडी मारण्यासाठी मुंबईने ताज्या दमाने नवे प्रयत्न करावे लागतील.
‘मुंबई’कर अजिंक्य रहाणेकडून
दिल्ली कॅपिटल्सला अपेक्षा
यापूर्वी साखळी फेरीत आरसीबीविरुद्ध अजिंक्य रहाणेने 60 धावांची विजय मिळवून देणारी खेळी साकारली आणि तो बहरात आला. आता मुंबई इंडियन्सविरुद्ध याच रहाणेकडून दिल्ली कॅपिटल्सला बऱयाच अपेक्षा असणार आहेत. रहाणेचा अनुभव पाहता, त्याने एकदा खेळपट्टीवर ठाण मांडून आक्रमक फलंदाजीला सुरुवात केली तर त्याला रोखणे कठीण असणार आहे आणि यापुढील प्रत्येक लढतीत सामन्याला कलाटणी देऊ शकणारा कोणताही खेळाडू तितकाच महत्वाचा ठरणार आहे.
मुंबई इंडियन्स संघाची ताकद सर्वांनाच ज्ञात आहे आणि याचमुळे मुंबई इंडियन्सविरुद्ध लढणे कोणत्याच संघाला नको आहे. आमची फलंदाजी जितकी भक्कम आहे, तितकीच गोलंदाजीही मजबूत आहे व हेच आमचे बलस्थान आहे. खेळाडूंना अनुभवाचा लाभ होईल, हे निश्चित आहे.
-मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक शेन बाँड