गोमंतकीयांच्या मनात मोठी भीती : मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे बोलण्याची मागणी
प्रतिनिधी / पणजी
दिल्ली ते गोवा अशी रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याने गोव्यात त्याबाबत तीव्र चिंता व्यक्त होऊ लागली आहे. ही रेल्वे सेवा गोव्यासाठी कोरोनावाहू ठरणार नाही ना अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे. गोवा सरकारने याबाबत केंद्र सरकारला कळविण्याची आवश्यकता आहे. दिल्ली-गोवा अशी रेल्वे सेवा सुरू करण्याची तूर्त तरी आवश्यकता नाही, असे मत स्पष्टपणे व्यक्त केले जात आहे.
देशभरात आज लॉकडाऊन आहे. 18 मे नंतर लॉकडाऊनचा कालावधी वाढणार आहे. देशभरात स्थिती वाईट असल्याने व कोरोनाचा फैलाव वाढत असल्याने लॉकडाऊनचा कालावधी वाढविला जात आहे. अशा स्थितीत दिल्ली ते गोवा अशी रेल्वे सेवा सुरू करणे धोक्याचे ठरू शकते. गोव्याच्या सीमा सील केल्या आहेत. अन्य राज्यातील लोकांना गोव्यात येण्यास बंदी आहे. अशावेळी दिल्ली ते गोवा अशी रेल्वे सेवा सुरू करणे गोव्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे गोवा सरकारने याबाबत केंद्र सरकारकडे बोलून तूर्त काही काळ गोव्यासाठी रेल्वे सेवा सुरू करू नये, अशी मागणी गोवा सरकारने करायला हवी.
विकतचे दुखणे सरकारने का घ्यावे
आठवडय़ातून दोनवेळा दिल्ली ते गोवा रेल्वे प्रवास सुरू होणार आहे. रेल्वेतून मोठय़ा प्रमाणात प्रवासी गोव्यात येतील. दिल्ली, महाराष्ट्रात आज कोरोनाचे संकट वाढत चालले आहे. गोव्यात कोरोनासंदर्भात रुग्ण जरी सापडले तर त्यांना कोरोंटाईन करण्याची पाळी गोवा सरकारवर येणार आहे. हे विकतचे दुखणे सरकारने का घ्यावे, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
राज्यात हॉटेल व्यवसाय बंद आहे. अन्य व्यवसाय नियंत्रणात सुरू आहेत. गोव्यात लॉकडाऊन आहे. अशावेळी बाहेरील लोकांना गोव्यात आणणे चुकीचे ठरणार आहे. दिल्ली राज्य सध्या रेड झोनमधून जात आहे. अशावेळी दिल्ली-गोवा रेल्वे प्रवास गोव्यासाठी संकट घेऊन येऊ शकते. सरकार हे संकट स्वतः का ओढून घेत आहे. शेजारील जिह्यातून येणाऱया लोकांना रोखणे कठीण जात आहे. गोवा सध्या बेळगाव, कारवार या भागातून येणाऱया वाहनांमुळे भीतीच्या छायेखाली आहे. अशा स्थितीत हे नवे संकट सरकार का ओढून घेत आहे, हेच कळत नसल्याचा संताप व्यक्त होत आहे. एकंदरीत दिल्ली ते गोवा रेल्वेमुळे गोव्यात सध्या भीतीचे वातावरण आहे.
दिल्ली-मडगाव रेल्वे : गोव्यासाठी घातक ठरणार : विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांचा दावा
प्रतिनिधी / पणजी
देशभरात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना रेल्वे गाडय़ा सुरू करणे हे अत्यंत धोकादायक आहे. दिल्ली ते गोवा (मडगाव) अशी रेल्वे गाडी सुरू केल्यास ‘ग्रीन झोन’मधील गोव्याच्या दृष्टीने ते अत्यंत घातक ठरणार आहे. रेल्वे संदर्भातला निर्णय चुकीचा ठरू शकतो. यासंदर्भात आपण पुढील दोन दिवसात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी सांगितले.
गोव्याच्या शेजारील राज्यांमधील स्थिती सुधारेपर्यंत तरी दिल्ली-गोवा अशी रेल्वे सुरू केली जाऊ नये. महाराष्ट्र, कर्नाटकात तसेच दिल्लीतही आज स्थिती अत्यंत वाईट आहे. महाराष्ट्रात दिवसाकाठी हजारभर कोरोना रुग्ण सापडतात. ही रेल्वे गाडी महाराष्ट्रातून गोव्यात येणार आहे. अशावेळी दिल्ली-गोवा अशी रेल्वे गाडी सुरू करणे प्रचंड धोकादायक ठरू शकते. गोवा सरकारने रेल्वेबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
रेल्वे सुरू करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय हा सध्याची स्थिती पाहता चुकीचाच आहे. त्यामुळे स्थिती आणखी भयानक होण्याची शक्यता आहे. आता दरदिवशी तीन हजारपेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत. देशभरातील रुग्णांची संख्या 70 हजारपेक्षा जास्त झाली आहे. अशा स्थितीत रेल्वे गाडय़ा सुरू केल्यास स्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे.
लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार
दिल्ली ते गोवा रेल्वे गाडी सुरू करण्याच्या विषयावर आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट होणार आहे. गोवा कोरोनाच्या बाबतीत सुरक्षित बनला आहे. त्यामुळे बाहेरील लोक गोव्यात येण्याची दाट शक्यता आहे. पावसाळा तोंडावर आला आहे. त्यामुळे कोरोनाचे एखादे प्रकरण जरी सापडले तरी ते गोव्यासाठी धोकादायक ठरू शकते. थंड वातावरण कोरोनासाठी पोषक ठरते. त्यामुळे गोवा सरकारने कोणताही धोका पत्करू नये, असे मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे, असे कामत यांनी म्हटले आहे.