दिवाळी सण मोठा नाही आनंदा तोटा! दिवाळी हा सण सर्वांचाच आवडीचा सण आहे. लहान, मोठा, गरीब, श्रीमंत कोणीही असो, तो आपापल्या परीने हा दिव्यांचा सण साजरा करत असतो. मग ते एखाद्याने अख्या घराला केलेली दिव्यांची रोषणाई असो किंवा एका छोटय़ा घरातील तुळशीसमोर लावलेला दिवा असो, दोन्हीची सकारात्मक ऊर्जा तितकीच तेजस्वी असते. दिवाळी हा सण असा आहे जो आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक नात्याला एक नवे चैतन्य देतो. वर्षभर कोणीही कितीही कामात असले तरी या सणाला प्रत्येकाला आपल्या जिवाभावाच्या माणसांची ओढ लागलेली असते.
इतरवेळेला आपापल्या दुनियेत मग्न असलेली माणसे दिवाळीपूर्वीच्या दिवसांमध्ये एकत्र येऊन साफसफाई, सजावट, खरेदी, फराळ बनवणे, रोषणाई करणे, यात आवडीने आवर्जून सहभागी होतात. सुरुवात होते घरातील प्रत्येक कानाकोपऱयाच्या सफाईने आणि त्यावरून चालू असलेल्या आईच्या सूचनांनी. माळय़ावरील अडगळ काढण्यापासून ते खोलीतील बेडशीट बदलण्यापर्यंत येत्या वर्षासाठी घराचा कायापालट करण्याची मोहीमच हातात घेण्यात येते. इतरवेळेला कुटुंबप्रमुख म्हणून आपली जबाबदारी पार पाडण्यात गुंतलेले वडीलसुद्धा या वेळेला घरकामात आपला हातभार लावतात. नवीन कपडे खरेदी करणे, एकमेकांकडे फराळाला जाणे, फटाके फोडणे, मित्र मैत्रिणींबरोबर किल्ला बनवणे, या सगळय़ा गोष्टींमधून माणूस खऱया अर्थाने जीवनाचा उत्सव साजरा करतो आणि सर्वत्र एक नवीन आशेचा किरण पसरतो.
दिवाळीच्या प्रत्येक दिवसाला आपले असे स्वतंत्र महत्त्व आहे. भारतीय संस्कृतीत फक्त माणसाला नाही तर, निसर्ग व त्यातील सर्व पशुपक्ष्यांना तितकाच मान द्यायला शिकवले गेले आहे. म्हणूनच भारतीय संस्कृतीतील सण हे आयुष्यातील सर्व घटकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरे केले जातात. दीपोत्सवाची सुरुवात वसू बारसने होते. भारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळे, पूर्वीच्या काळी माणसाची श्रीमंती गोधनाने मापली जायची. गोमातेच्या दुधातून आपल्याला जीवनावश्यक पोषक अंश मिळतात आणि त्याबद्दलच आभार मानायला, तिची पूजा केली जाते. या दिवसाचे पावित्र्य आज नष्ट होत चालले आहे. औद्योगिकीकरणामुळे, गाई-गुरांचे हाल होतात आणि एकेकाळी शुद्ध मानलेल्या दुधात आज सगळीकडे भेसळ आढळते.
वैद्य हे साक्षात देवाचे रूप मानले गेले आहेत. अहोरात्र अभ्यास करून, मन कठोर करून, दुसऱयाच्या सेवेसाठी तन मन वेचणाऱया त्या देवदूतांचा सन्मान करण्यासाठी धनत्रयोदशी साजरी केली जाते. सध्या सगळय़ाच गोष्टी इतक्मया सहजतेने मिळतात, म्हणून आपल्याला त्याची किंमत राहिलेली नाही. त्यामुळेच आजकाल प्रत्येकजण स्वयंघोषित ‘वॉट्सअप डॉक्टर’ झाला आहे. त्यामुळे सन्माननीय वैद्यकीय पेशाची किंमत कमी झाली आहे. भर दिवसा डॉक्टरांवर हल्ले, रुग्णालयाची तोडफोड करून नुकसान करणे, हे लोकांना नैतिकदृष्टय़ा चुकीचे वाटतच नाही.
कोणताही जीव जो नैतिक मूल्यांचे पालन करत नाही व दुसऱया जीवाला हानी पोचवण्याची वृत्ती बाळगतो, तीच खरी राक्षसीवृत्ती असते. नरक चतुर्दशीला श्रीकृष्णाने जसा नरकासुराचा वध केला होता, तसाच या दिवसाच्या निमित्ताने आपण सर्वानी आपल्यामधील राक्षसी वृत्तीचा वध केला पाहिजे. भारतीय संस्कृतीमध्ये पाश्चात्य संस्कृतीचीच भेसळ झाल्यामुळे, कोणता सण का साजरा करायचा, त्याचे सामाजिक व मानसिकदृष्टय़ा महत्त्व काय, हे आपण कुठेतरी विसरत चाललो आहोत. नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नान केले जाते. कार्तिक महिन्यामध्ये हिवाळय़ाची सुरुवात झालेली असते आणि त्यामुळे, सर्वत्र थंडगार वातावरण पसरलेले असते. अशावेळेला त्वचेत रुक्षता वाढलेली असते आणि त्याला स्निग्धतेची गरज असते. पहाटे उठून तेल आणि उटण्याने अभ्यंगस्नान केल्याने त्वचा मुलायम राहते. पण सर्वांच्या अति व्यस्त दिनचर्येमुळे, या गोष्टीची जाणीव कमी होताना दिसते आहे. माणूस हा पैसे कमवण्याच्या नादात स्वतःकडे लक्ष द्यायचे विसरला आहे आणि म्हणूनच त्याचे दुष्परिणामही आपल्याला खूप कमी वयापासून शरीरावर दिसतात.
लक्ष्मीपूजनाचे महत्त्व हे फक्त धनसंपत्तीशी निगडित नसून, स्वच्छतेशीही जोडले गेले आहे. या दिवशी धनाची पूजा करण्याआधी, झाडूची पूजा केली जाते. यावरूनच हे लक्षात येते की आपल्या संस्कृतीमध्ये, जिथे स्वच्छता, तिथे आरोग्य, आणि तेथेच धन हे माहिती होते. 2020 मध्ये आलेल्या कोरोनानामक जागतिक महामारीने आपल्याला स्वच्छतेचे महत्त्व अधिकच पटवून दिले आहे. लक्ष्मी पूजन आपल्याला हेही शिकवते की धनसंपत्तीला सर्वेसर्वा समजू नये, कारण आरोग्य नाही, तर आयुष्य नाही आणि आयुष्य नाही, तर धन संपत्तीचा काय उपयोग?
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा दिवस म्हणजे बलिप्रतिपदेचा दिवस असतो. हा दिवस जेवढा पती पत्नींसाठी महत्त्वाचा आहे तेवढाच व्यापारी लोकांसाठीसुद्धा आहे. लग्न म्हणजे दोन आयुष्यांमधे बांधले जाणारे एक पवित्र बंधन आहे. त्याच अनमोल नात्याचे जतन करण्यासाठी हा दिवस असतो. आजकाल लग्न हे पवित्र नाते नसून, एक व्यावहारिक तडजोड बनून राहिले आहे. जर या सगळय़ा वारसांचे सार आपण लक्षात घेतले तर बदलत्या काळाबरोबर जगत असतानासुद्धा आपण आपल्या जीवनमूल्यांचे रक्षण करू शकतो.
आपल्या आयुष्यात प्रत्येक नाते आणि प्रत्येक माणूस महत्त्वाची भूमिका बजावत असतो. मग ते आपले आई वडील असोत, मित्र-मैत्रिणी असोत किंवा भावंडे असोत. आपले भावंड हे आपले पहिले मित्र असतात आणि आपल्या सामाजिक जडण घडणीमध्ये मोलाचा वाटा उचलत असतात. ज्या गोष्टी आपण आई वडील किंवा शिक्षकांजवळ व्यक्त करू शकत नाही, त्या आपण भावंडांबरोबर खुल्या दिलाने व्यक्त करू शकतो. एका मुलीच्या आयुष्यात तिचा भाऊ हा तिचा मित्र, तत्त्वज्ञ आणि वाटाडय़ा असतो, जो कुठल्याही परिस्थितीत तिची साथ द्यायला तयार असतो. अशाच एका अद्वितीय नात्याचा अनमोल उत्सव म्हणजे भाऊबीज होय. औद्योगिकीकरणामुळे जरी माणूस आज प्रत्येक गोष्टीत व्यावहारिक झाला असला तरीही, या सगळय़ा मौल्यवान संस्कृतीचा साठा भारताकडे अजूनही आहे. या सणाचे फक्त धार्मिकच नाही तर सामाजिक, वैचारिक आणि मानसिक महत्त्व जाणून घेऊन, एक नवीन आशेचा किरण या व्यवहारी जगाला दाखवण्याची गरज आहे, कारण सध्या माणसाला संपत्तीचा साठा नाही तर मनःशांतीची गरज आहे.
– श्राव्या माधव कुलकर्णी