18वर्षे सेवा दिल्यानंतर पोस्टमनना हाकलून देण्याचे प्रकार : भारतीय ढाक विभाग फोंडा कार्यालयाचा अजब कारभार
प्रतिनिधी/फोंडा
wफोंडा येथील भारतीय ढाक विभाग (पोस्ट विभागात) पोस्टमन म्हणून कार्यरत असलेल्यांना विनानोटीस कोणतीच पुर्वकल्पना ना देता कामावरू कमी केल्याने त्याना उदारनिर्वाहाची व भविष्याची चिंता सतावू लागली आहे. सुमारे 18 वर्षे रोजंदारीवर काम करूनही अचानक कामावरून कमी केल्याने या वयात जावे कुठे ? असा सवाल कामावरून कमी केलेल्या सात पोस्टमनांनी केला आहे. आम आदमी पक्षाचे उपाध्यक्ष ऍड सुरेल तिळवे यांनी पाठिंबा दर्शविला आहे.
फोंडा येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना पोस्टमनांनी आपली व्यथा मांडली. फोंडा शहर परिसरात हे सात पोस्टमन मागील 18 वर्षापासून रोजंदारीवर सेवा बजावत आहे. रोजंदारीवर असलेल्या पोस्टमनना कमी करून त्याऐवजी महाराष्ट्रातील पोस्टमन सेवा देणार असल्याची माहिती त्यांना देण्यात आली आहे. यासंबंधी पोस्टमास्टर सुरेखा परब यांच्यांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान रोजंदारीवर कामाला असलेल्या पोस्टमननी सेवेत कायम करण्यासंबंधी उत्तर गोवा खासदार श्रीपाद नाईक, द.गोवा खासदार फ्रान्सिस सार्दीन, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतलेली आहे. मात्र अजून कोणताच तोडगा काढलेला नाही. तोडगा काढण्याऐवजी सरकारने कामावरून कमी केल्याने आपल्यासह आमच्या कुटूबियांवरही अन्याय केल्याची प्रतिक्रिया यावेळी दिली. अन्यथा राज्य सरकारने कुठल्याही रोजंदारीच्या कामावर सातही जणांना रूजू करून घ्यावे अशी कळकळीची विनंती केली आहे.
दीर्घ काळ सेवा देणाऱया पोस्टमनना सेवेत रूजू करा-ऍड सुरेल तिळवे
यावेळी बोलताना ऍड सुरेल तिळवे म्हणाले की मागील 18 वर्षापासून कार्यरत असलेल्या पोस्टमनना डावलून त्याऐवजी परराज्यातील युवकांची भर्ती करून सरकार गोमंतकीयावर अन्याय करीत आहे. महारष्ट्रातील पोस्टमन फोंडा शहर परिसरात जलदगतीने सेवा देण्यात कितपत यशस्वी होणार यावरही मोठे प्रश्नचिन्ह आहे. सद्या वाहतूक खात्यातर्फे ग्राहकांचे वाहन परवाना व इतर कामे थेट पोस्ट कार्यालयातून वर्गीकृत करण्यात आलेली आहे.सरकारी रोजगारासंबंधी मुलाखती व मंजूरीपत्राचा पत्रव्यवहारही पोस्टच्या माध्यमातून होत असल्याने युवावर्गावरही याचा परिणाम होणार आहे. दीर्घकाळ सेवा दिलेल्या पोस्टमनची वयाची 45 वर्षे ओलांडली असून अन्यत्र रोजगार मिळणेही कठीण असल्याने त्यांना पुनः टपाल वितरण सेवेत रोजंदारीवर कार्यरत करावे अशी मागणी ऍड. सुरेल तिळवे यानी केली आहे.