वार्ताहर /किणये:
सायकलवरून गवत घेऊन येत असताना पाठीमागून येणाऱया दुचाकीस्वाराने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात शेतकरी ठार झाला आहे. पिराजी यल्लाप्पा बिळगोजी (वय 65) असे त्या दुर्दैवी शेतकऱयाचे नाव असून सदर घटना गुरुवारी सायंकाळी सातच्या दरम्यान हलगा (बस्तवाड) बायपास रस्त्यावर घडली.
शेतकऱयाला धडक देऊन सदर दुचाकीस्वाराने पलायन केले आहे. मात्र बाजूलाच असलेल्या एका खासगी कंपनीच्या सीसीटीव्ही कॅमेऱयामध्ये अपघाताची घटना कैद झाली असून याबाबतचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती बागेवाडी पोलीस स्थानकाचे सीपीआय एन. एन. अंबीगेर यांनी दिली.
याबाबत घटनास्थळ व हलगा गावातील नागरिकांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी, मरगाई गल्ली, हलगा येथील शेतकरी पिराजी बिळगोजी हे शेतामधून गवत घेऊन सायकलवरून हलगा बायपास रस्त्यावरून येत होते. यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱया दुचाकीस्वाराने त्यांना जोराची धडक दिली, अन काही क्षणातच त्याने तेथून पलायन केले. अपघातात पिराजी हे गंभीर जखमी झाले. त्यांना लागलीच सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना केएलई इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
गुरुवारी दुपारी हलगा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी सकाळी 8 वाजता होणार आहे.
बिळगोजी कुटुंबावर आघात
गेल्या तीन महिन्यांपूर्वी पिराजी बिळगोजी यांचे सुपुत्र यल्लाप्पा बिळगोजी यांचा बेळगाव येथे अपघात झाला. ते पत्नीसमवेत दुचाकीवरून जाताना हा अपघात झाला होता. यात यल्लाप्पा यांच्या पायाला दुखापत झाली होती ते हॉस्पिटलची वारी करित असतानाच बुधवारी वडील अपघातात ठार झाल्याने बिळगोजी कुटुंब हतबल झाले आहे.