प्रतिनिधी/ बेळगाव
आपल्या क्षेत्रात निर्माण होणाऱया कचऱयाची विल्हेवाट कशी लावता अशी विचारणा केली असता सर्व खात्यांच्या अधिकाऱयांनी महापालिकेकडे बोट दाखवून जबाबदारी झटकण्याचा प्रकार केला. मात्र यापुढे असे चालणार नाही, प्रत्येक क्षेत्रातील कचऱयाची विल्हेवाट संबंधित खात्यालाच करावी लागणार आहे. जर याकडे दुर्लक्ष केल्यास अधिकाऱयांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका कार्यालयातील बैठकीत राष्ट्रीय हरित लवादचे अध्यक्ष सुभाष आडी यांनी दिला.
कायद्यानुसार निर्माण होणाऱया कचऱयाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी संबंधित विभागाची किंवा सुविधा पुरविणाऱया कंपनीची, खात्याची आहे. स्वच्छता कायदा जाणून घेण्यासाठी प्रत्येक अधिकाऱयाने कायद्याचे वाचन करावे, अशी सूचना केली. विद्युतवाहिन्यांना अडथळा ठरणाऱया झाडांच्या फांद्या तोडून रस्त्याशेजारी टाकल्या जातात. या कचऱयाची विल्हेवाट हेस्कॉम अशी लावते, अशी विचारणा सुभाष आडी यांनी हेस्कॉमच्या अधिकाऱयांकडे केली असता अधिकारी निरुत्तर झाले. तोडण्यात आलेल्या झाडांच्या फांद्यांचा कचरा उचल करून हेस्कॉमनेच विल्हेवाट लावण्याची सूचना केली. जर जबाबदारी टाळल्यास संबंधित अधिकाऱयांकडून दंड वसूल केला जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. याचे पालन सर्व खात्यांच्या अधिकाऱयांनी करावे असे आवाहनही केले. रस्त्याशेजारी टाकण्यात आलेले जीर्ण विद्युत खांब 24 तासात हटविण्याचा आदेश त्यांनी दिला. पाणीपुरवठा योजनेची कामे करताना कचऱयाची विल्हेवाट कशी लावता, अशी विचारणा अधिकाऱयांकडे करून शहरातील रस्त्यांची खोदाई केल्यानंतर आवश्यक दक्षता घेतली जात नसल्याची टीका केली.
बुडाने निर्माण केलेल्या वसाहतांमध्ये डेनेज वाहिन्या का घातल्या नाहीत, डेनेज सुविधा नसताना लेआऊट कसे केले, अशी विचारणा बुडा योजनाधिकारी ए. एस. कांबळे यांना केली. याबाबत त्यांना समर्पक उत्तर देता आले नाही. बुडाच्या वसाहतींमध्ये डेनेज वाहिन्या उपलब्ध करा, तसेच कचरा विघटन करण्यासाठी 5 टक्के जागा राखीव ठेवण्याची सूचना केली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मंडळाने स्वच्छतेसाठी आवश्यक खबरदारी घेतली आहे. पण बळ्ळारी नाल्याशेजारी तसेच राष्ट्रीय महामार्ग आणि सर्व्हिस रोडशेजारी शहरातील कचरा टाकण्यात येत असल्याने याबाबतची तक्रार महापालिकेकडे छायाचित्रांसह केली आहे. पण याबाबत महापालिकेकडून कोणतीच कारवाई केली जात नसल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मंडळाच्या अधिकाऱयांनी सांगितले.
याबाबत महापालिकेकडे वारंवार तक्रार केली असून रात्रीच्या वेळी कचरा टाकला जात असल्याचे माजी नगरसेवक नेताजी जाधव यांनी सांगितले. सांबरा विमानतळ रोडशेजारी टाकण्यात येणाऱया कचऱयाची बाब सुभाष आडी यांनी गांभीर्याने घेतली. याबाबत विमानोड्डाण प्राधिकरण मंडळाच्या अधिकाऱयांना विचारणा करून आवश्यक उपाययोजना राबविण्याची सूचना केली. विमानोड्डाण प्राधिकरण मंडळ केंद्र शासनाच्या अखत्यारित येते. त्यामुळे ग्राम पंचायतकडे बोट करून जबाबदारी झटकू नये. कचऱयाची विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक उपक्रम राबविण्याची सूचना केली.
यावेळी एंडोमेंट विभागाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम खाते, कॅन्टोन्मेंट बोर्ड, स्मार्ट सिटी कंपनीचे अधिकारी, चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी तसेच हॉटेल ओनर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱयांनी बैठकीकडे पाठ फिरविल्याने नाराजी व्यक्त केली.