पगार वेळेवर देत नसल्याने खून केल्याची कबुली : रेल्वेस उशीर असल्याने सापडले पोलिसांच्या तावडीत : शिवाजी पार्क जवळून तिघांनाही घेतले ताब्यात
प्रतिनिधी / मडगाव
चंद्रावाडा – फातोर्डा येथील दुहेरी खुन प्रकरणातील तिन्ही आरोपीना मुंबई पोलिसांनी शिवाजी पार्क-दादरजवळ अटक केली. बिहार आणि झारखंडला पलायन करण्यापूर्वीच या आरोपींना अटक करण्यात आल्याने गोवा आणि मुंबई पोलिसांचे कौतूक होत आहे. बिहार राज्यातील रविन कुमार शामकुमार साधा (18), झारखंड राज्यातील आकाश अजयकुमार घोष (20) व झारखंड राज्यातील आदित्यकुमार रमेश खरवाल (18) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्व आरोपी फातोर्डा येथील कंत्राटदार मयत मिंगेल मिरांडा यांच्याकडे कामाला होते.
सध्या मुंबई पोलिसांचे कौतूक होत आहे. दुहेरी खून प्रकरण रविवारी रात्री घडले होते. खुनाची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. घटना उघडकीस आल्याच्या वेळेपासून 24 तासाच्या आत खुनाचा हा तपास लावण्यात पोलिसांना यश आले.
पगार वेळेवर देत नसल्याने केला खून
मयत मिंगेल मिरांडा हा एक कंत्राटदार होता आणि सार्वजनिक बांधकाम खात्याकडून तसेच इतर ठिकाणाहून कंत्राट घेऊन तो ते कंत्राट पूर्ण करी. त्यासाठी हा कंत्राटदार आपल्याकडे कामगार ठेऊन घेत आणि त्यांना पगार देत असे. मात्र, पगार देण्यात विलंब होत असल्याचे पाहुन या तिन्ही आरोपींनी कंत्राटदार मिंगेल मिरांडा (65) व त्यांची सासू कातारीन पिंटो (85) यांचा रविवारी 7 मार्च रोजीच्या रात्री लोखंडी घणाने त्यांच्यावर जोरदार आघात करुन खून केला. कातारीन पिंटो हिचाही अशाच पद्धतीने खून करण्यात आला.
मयत मेंगेल मिरांडा यांच्या मुलाची एक दुचाकी होते. खुनानंतर आरोपी तेथील दुचाकी घेऊन वास्कोला गेले. वास्को रेल्वे स्थानकाच्या परिसरात त्यानी ती दुचाकी टाकून दिली आणि मुंबईला जाणारी रेल्वे पकडली आणि त्यांचा मुंबईच्या दिशेने रेल्वे प्रवास सुरु झाला.
ओळखपत्रांवरुन मिळाली आरोपींची छायाचित्रे
खून रविवारी रात्री करण्यात आला होता. सोमवारी सकाळी दुहेरी खुनाचे प्रकरण उघडकीस आले होते. याचा अर्थ या खुनाचे प्रकरण पोलिसाच्या कानी येईपर्यंत बरेच तास गेले होते. याचाच फायदा आरोपींनी घेतला होता. आरोपी नेमके कोठे असावेत याचा थांगपत्ता लागला नव्हता. मयत कंत्राटदाराकडे आरोपींचे ओखळपत्र होते. या ओळखपत्रावर आरोपींचे फोटो होते. फातोर्डा पोलिसांनी आरोपींची ही छायाचित्रे जवळच्या राज्यातील पोलिसांना पाठवली. त्यानंतर गोवा पोलिसांना जवळ जवळ निश्चित माहिती मिळाली. आरोपी मुंबईच्या दिशेने जात असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार गोवा पोलिसांनी मुंबई पोलिसांना सावध केले.
मुंबई पोलिसांनी दादरला पकडले आरोपींना
मुंबईचे पोलीस सह-आयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंबे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) एस. विरेश प्रभू, पोलीस उप-आयुक्त प्रकाश जाधव, साहाय्यक पोलीस आयुक्त नितीन अलकनुरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक निनाद सावंत, पोलीस निरीक्षक संजय निकम, उपनिरीक्षक अशोक आम्रे, हवालदार चंद्रकांत राऊत, हवालदार सुनिल साळुंके, हवालदार उत्तम बोटे, अजय बल्लाळ, पोलीस शिपाई तानाजी घेर्डे, सुशिल साळुंके, लखन चव्हाण, किरण चारवेकर यांनी कारवाई करुन या तिन्ही आरोपींना अटक केली.
दक्षिण गोववा पोलीस अधीक्षक राकेशकुमार, मडगाव विभागाचे पोलीस उपअधीक्षक हरीष मडकईकर, फातोर्डा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक कपील नायक, उपनिरीक्षक तेजसकुमार नाईक यांचा या कामी महत्वाचा भाग हेता. आज बुधवारी पहाटेपर्यंत आरोपींना गोव्यात आणले जाण्याची शक्यता आहे.
मुंबईतील शिवाजी पार्कजवळ सापडले तिघेही
गोवा पोलिसांनी आरोपींची छायाचित्रे सर्वत्र पाठवली होती आणि त्या छायाचित्रांच्या आधारे मुंबई पोलिसांनी अनेक पथके तयार केली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, दादर टर्मिनल, कुर्ला टर्मिनल, वडाळा रेल्वे स्थानकावर मुंबई पोलिसांतर्फे आरोपींची माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरु झाला. आरोपी झारखंड, बिहार राज्यातील होते. दादर-मुंबई येथून झारखंडला रेल्वे कधी सुटते याची त्यांनी चौकशी केली होती. रेल्वे सुटायला उशीर होता आणि वेळ घालवण्यासाठी आरोपी शिवाजी पार्कच्या दिशेने जात होते. त्याचवेळी आरोपी मुंबई पोलिसांच्या रडारवर आले आणि पोलिसांच्या जाळय़ात सापडले. संशयित आरोपीप्रमाणे दिसणारे हे तिघेजण दादर परिसरातील चैत्यभुमीजवळील शिवाजी पार्क येथे हातात बॅग घेऊन वावरत असल्याचे मुंबई पोलिसांना आढळून आले. या तिघांनाही साध्या वेशातील पोलिसांनी हटकले. त्यांची तेथेच चौकशी केली. हे तिन्ही आरोपी छायाचित्रातील व्यक्तीसारखे दिसत होते. गोव्यातील दुहेरी खून प्रकरणासंबंधी त्यांची तेथेच चौकशी सुरु केली तेव्हा त्यांनी आपला गुन्हा कबुल केला. कामाची रक्कम लवकर देत नसल्याच्या कारणावरुन आम्ही वरील कंत्राटदाराचा व त्यावेळी घरात असलेल्या वृद्ध महिलेचा खून केल्याची कबुली त्यांनी दिली.