ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजपने एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. देवेंद्र फडणवीस यांची बिहार निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, यंदा बिहार विधानसभेच्या निवडणूका तीन टप्प्यात होणार आहेत. पहिल्या टप्प्याचे मतदान 28 ऑक्टोबर, दुसऱ्या टप्प्याचे मतदान 3 नोव्हेंबर आणि तिसऱ्या टप्प्याचे मतदान 7 नोव्हेंबरला होणार आहे. तर 10 नोव्हेंबर रोजी बिहारचा निकाल स्पष्ट होणार आहे.
प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा मी आभारी आहे. एक कार्यकर्ता म्हणून माझ्यासाठी ही एक शिकायची संधी आहे. पूर्ण ताकदीनिशी आम्ही बिहारची निवडणूक लढू असेही त्यांनी यावेळी सांगितले.
फडणवीस यांच्यावर पक्षाकडून अन्य राज्याच्या निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी पहिल्यांदाच सोपवण्यात आहे. फडणवीस यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूकी दरम्यान आपल्या संघटन कौशल्याचा वापर करत सर्वाधिक उमेदवार निवडून आणले होते, त्यानंतर त्याच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे.