वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशभरात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या मंगळवारी 138 झाली. यामध्ये 114 भारतीय तर 24 विदेशी नागरिकांचा समावेश आहे. महाराष्ट्रात अमेरिकेवरून परत आलेले आणखी दोन तरुण पॉझिटिव्ह आढळल्याने बाधितांची संख्या 41 झाली आहे. तर केरळमधील रुग्णांची संख्या 24 आहे. सध्या देशभरातील 54 हजार संशयित रुग्णांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राज्यसभेत दिली.
कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहता भारतीय पुरातत्व विभागाने 31 मार्चपर्यंत देशातील सर्व वस्तूसंग्रहालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. दिल्लीतील कुतूबमिनार परिसर मंगळवारपासून बंद ठेवण्यात आला. दरम्यान, कर्नाटकमधील कलबुर्गी येथे कोरोनामुळे वृद्धाचा मृत्यू झाला होता. त्यांच्यावर उपचार करणाऱया डॉक्टरला कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित डॉक्टर आणि त्याच्या कुटुंबावर विलगीकरण कक्षात उपचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. कोरोना विषाणूची लागण झाल्याचा संशय व्यक्त करत केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरण हे सार्वजनिक जीवनापासून लांब झाले आहे. सध्या त्यांचे वास्तव्य केरळमधील त्रिवेंद्रम येथे आहे.
सर्वांनी मास्क वापरण्याची गरज नाही : आरोग्य मंत्रालय
कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी सर्वांनी मास्क वापरण्याची गरज नाही. खोकला, ताप आणि श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या रुग्णांसह कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांवर उपचार करणाऱयांनीच मास्क वापरावा, असे आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले आहे.
तीन देशातील प्रवाशांना भारतबंदी
युरोपियन युनियन, तुर्की आणि ब्रिटनमधील प्रवाशांना 31 मार्चपर्यंत भारतात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच सौदी अरेबिया, कतार आणि ओमानमधून भारतात येणाऱया सर्व प्रवाशांना 14 दिवस विलगीकरण कक्षात ठेवले जाईल, असे आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी स्पष्ट केले. देशभरातील नागरिकांनी प्रवास टाळावा. गरज असेल तरच रेल्वे, बस आणि विमानातून प्रवास करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.