ऑनलाईन टीम/तरुण भारत
मागील तिमाहीच्या तुलनेत जून-सप्टेंबरदरम्यान देशाच्या विकासदरामध्ये घसरण होत असून विकास दर ८.४ टक्क्यांवर पोहोचला आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे त्याचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसला आहे; मात्र ही कोविडपूर्व काळापेक्षा अधिक चांगली वाढ झाली असल्याचे शासकीय आकडेवारीनुसार समजते. खाण क्षेत्र, तसेच सार्वजनिक सेवा, संरक्षण आणि अन्य सेवांमध्ये वर्गवारीनुसार सर्वाधिक वाढ झाली असल्याचे समजत आहे.
दरम्यान, देशाचा विकास दर घसरून ८.४ टक्क्यांवर पोहोचला आहे. एप्रिल-जून या तिमाहीमध्ये विकासदर २०.१ टक्के होता; तर मागील वर्षी समान कालावधीत तो २४.४ टक्के होता. गेल्या वर्षी दुसऱ्या तिमाहीत जीडीपी ७.४ टक्क्यांवर पोहोचला होता, अशी आकडेवारी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जारी केली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये केंद्र सरकारने देशात लॉकडाउन लागू केला होता; मात्र या वर्षी एप्रिलच्या मध्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याने नव्याने निर्बंध लागू करण्यात आले होते. मागील वर्षी जुलै-सप्टेंबरमध्ये जीडीपी ३५,६१,५३० कोटी रुपयांनी वाढला होता. तर या वर्षी यात वाढ होत ३५,७३,४५१ कोटी रुपयांनी वाढला. गेल्या वर्षी लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने दुसऱ्या तिमाहीत जीडीपी ३२,९६,७१८ कोटी रुपयांनी घसरला होता.