दिवसभरात जवळपास 45 हजार रुग्ण- 41 हजार जणांना डिस्चार्ज
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतात कोरोनाच्या दुसऱया लाटेच्या प्रादुर्भावात घट झाली असली तरी धोका अद्याप टळलेला नाही. ऑगस्ट महिन्यात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडय़ात वाढ होत असल्याचे दिसत आहे. शुक्रवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गुरुवारच्या 24 तासांत देशात 44 हजार 643 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 464 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचदरम्यान 41 हजार 96 रुग्णांना उपचाराअंती डिस्चार्ज देण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
देशात आतापर्यंत 3 कोटी 18 लाख 56 हजार 757 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी 4 लाख 26 हजार 754 जणांचा मृत्यू झाला असून 3 कोटी 10 लाख 15 हजार 844 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केलेली आहे. देशात अजूनही 4 लाख 14 हजार 159 इतके सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. देशात सध्या दैनंदिन 40 हजारांहून अधिक नव्या रुग्णांची भर पडत आहे. यापूर्वी बुधवारी देशात 42 हजार 982 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. तर 533 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता. नव्या रुग्णांच्या तुलनेत डिस्चार्ज मिळणाऱयांचा आकडा कमी असल्यामुळे सक्रिय रुग्णांमध्ये वाढ होत आहे.
केरळात वाढता संसर्ग कायम
केरळात गुरुवारी कोरोनाच्या 22,040 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. त्यानंतर राज्यातील एकूण बाधितांची संख्या वाढून 34.93 लाखांवर पोहोचली आहे. तर 117 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 17,328 वर पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 32 लाख 97 हजार 834 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या 1 लाख 78 हजार 441 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. केरळप्रमाणेच महाराष्ट्रातही दिवसभरातील नव्या रुग्णांचा आकडा 9 हजारपर्यंत वाढला आहे.