नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येने चार लाखांचा टप्पा पार केला आहे. विविध राज्यांमध्ये चाचण्यांची संख्या वाढत असल्याने बाधितांचा आकडा झपाटय़ाने वाढत चालला आहे. रविवारी दिवसभरात 15 हजारहून अधिक रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 4 लाख 10 हजारच्या पुढे गेली आहे. तसेच कोरोनाबाधित मृतांचा आकडाही 306 ने वाढला असून एकूण मृत 13 हजार 300 पर्यंत पोहोचले आहेत. तसेच देशभरात 14 हजार रुग्णांचे अहवाल ‘निगेटिव्ह’ आले असल्याची माहिती रविवारी आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
महाराष्ट्रात 3874 नवे रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या 1 लाख 28 हजार 205 इतकी झाली आहे. रुग्णसंख्या वाढतानाच बरे होऊन घरी परतण्याचे प्रमाणही वाढत आहे. महाराष्ट्रात रविवारी 1380 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत 65 हजार रुग्ण ‘निगेटिव्ह’ झाले आहेत. तामिळनाडू, दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यांमध्येही रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. जम्मू काश्मीरमध्ये रविवारी नवे 122 रुग्ण आढळून आले आहेत.
दिल्लीतील स्थितीचा केंद्राकडून आढावा
दिल्लीतील कोरोना संसर्गाचा धोका दिवसेंदिवस अधिक गडद होत चालला आहे. मागील आठवडय़ापासून दिल्लीमध्ये केंद्रीय आरोग्य विभागाकडूनही देखरेख व मदत पुरविली जात आहे. रविवारी पुन्हा एकदा दिल्लीतील आरोग्य यंत्रणेचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी आढावा घेतला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह उपराज्यपालांची भेट घेत त्यांनी सविस्तर चर्चा केली. तसेच काही रुग्णालयांमध्ये जात डॉक्टरांशी सल्लामसलत करत एकंदर परिस्थिती जाणून घेतली.