नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येने सोमवारी 18 लाखांचा आकडा पार केला.. गेल्या 24 तासात कोरोनाचे जवळपास 53 हजार नवे रुग्ण सापडले आहेत. सोमवारपर्यंत एकूण कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढून 18 लाख 3 हजार 695 झाली आहे. मृतांचा आकडाही 771 ने वाढून 38,135 झाला आहे.
आरोग्य मंत्रालयाने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशात 5 लाख 79 हजार 357 इतके सक्रिय रुग्ण आहेत. तसेच 11 लाख 86 हजार 203 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 65.44 टक्के झाला आहे. गेल्या 24 तासात 52 हजार 972 रुग्ण वाढले आहेत. तर दिवसभरात 771 लोकांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी शनिवारी 54,735 नवे रुग्ण आढळले होते. तसेच 853 जणांचा बळी गेला होता.
कोरोना विषाणूचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात झाला आहे. महाराष्ट्रात दिवसभरात 9 हजार 509 नवे रुग्ण आढळल्यानंतर एकूण संक्रमितांची संख्या 4 लाख 41 हजार 228 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासात आणखी 260 रुग्णांचा मृत्यू झाल्याने राज्यात या महामारीमुळे आपला जीव गमावलेल्या लोकांची संख्या 15 हजार 576 झाली आहे. दिवसभरात 9 हजार 926 रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. महाराष्ट्रात आता 1 लाख 48 हजार 843 रुग्ण उपचार घेत आहेत.
रविशंकर प्रसाद ‘आयसोलेटेड’
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोना संसर्गाची बाधा झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या अधिकारी, पदाधिकाऱयांसह मंत्री महोदयांनी स्वतःची चाचणी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच बऱयाच जणांनी स्वतःला आयसोलेट केले असून त्यामध्ये केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचाही समावेश आहे.