ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात पहिल्या टप्प्यातील 49 लाखांहून अधिक लोकांना कोरोना लस देण्यात आली आहे. त्यापैकी 97 टक्के लोकांनी कोरोना लसीबद्दल समाधान व्यक्त केले आहे. तर 8663 लोक लस घेतल्यानंतर आजारी पडले. लस देण्यात आलेल्या 37 लाख लोकांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाकडून करण्यात आला. मात्र, केवळ 5,12,128 लोकांनी त्याला प्रतिसाद दिला. लस घेतलेल्या 34 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, कोविड-19 च्या लसीकरणानंतरही काही रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पण या लसीचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. लसीकरणानंतर मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचे पोस्टमॉर्टेम करण्यात आले असून, राज्य आणि राष्ट्रीय लसीकरण समिती आकडेवारीचा आढावा घेत आहे.
देशातील 5,912 सार्वजनिक आणि 1,239 खासगी रुग्णालये आणि केंद्रांमध्ये लसीकरण मोहीम सुरू आहे. लाभार्थ्यांची आकडेवारी कॉव्हिन प्रणालीच्या माध्यमातून जतन केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.