अध्याय अकरावा
देहविरहित असणारा सिद्धपुरुष दैनंदिन व्यवहारात कसा वागतो ते भगवंत उद्धवाला स्पष्ट करत आहेत. ते म्हणाले, उद्धवा जीव आणि शिव एकच असून त्यांच्यात दोष नसतो, तो अंतःकरणामध्ये असतो. तो काढून चित्तच शुद्ध केले म्हणजे अज्ञान नष्ट होते. रज, तम गुण प्रबळ झाले की अज्ञान वाढते. सत्त्वगुणाची वाढ केली की रज, तम गुण झडून जातात. असे झाले की अज्ञान संपुष्टात येते व आत्मविद्या किंवा आत्मज्ञान प्राप्त होते आणि जीवा शिवाची गाठ पडते. मी एकाशिवाय दुसरे काही शिल्लकच रहात नाही. तेव्हा जे चित्तशुद्धी साधतात त्यांना माझा खरा आत्मानुभव मिळतो. हा आत्मानुभव ज्यांनी घेतलेला आहे ते मुक्त असतात.
अशा मुक्तांच्या दृष्टीने समोर दिसणारे जग हे एक घटकाभर पडणारे स्वप्नच असते. जाग आली की स्वप्नातील घटना मिथ्या होत्या हे लक्षात येते त्याप्रमाणे संसार व त्यातील घटना मिथ्या आहेत याची त्यांना खात्री असते. पण जे मुक्त नसतात म्हणजे देहात असतात त्यांना ज्या गोष्टीला मुळातच अस्तित्व नाही ती वस्तू हरवली की फार वाईट वाटते. त्याला शोक म्हणतात. मुळातच जी वस्तू अस्तित्वात नाही त्या वस्तूच्या ठिकाणी मी आणि माझे हा अभिमान बाळगतो.
असा अभिमान बाळगणे हे मोहाचे लक्षण आहे. वस्तू हवीशी वाटू लागली की, तिचा मोह होऊ लागतो. मोह होऊ लागला की मनाला त्या वस्तूबद्दल ममत्व वाटू लागते. ममत्वामुळे त्या वस्तूपासून स्वतःला सुख मिळण्याची तो अपेक्षा करू लागतो. पुत्रापासून मोठी सुखप्राप्ती होईल असे आईबाप म्हणत असतात आणि या चुकीच्या समजुतीने त्यांना त्याचा मोह पडलेला असतो. पण शेवटी पुत्र त्यांना अंगठाच दाखवतात. चित्रातील रचना पाहून मनाला अभिलाष उत्पन्न व्हावा आणि ती मिळवण्यासाठी खटपट करावी त्याप्रमाणे देहातील अभिमान हा मिथ्या होय. देहासंबंधी ममता फार कठीण असते. त्या ममतेतून फाजील आत्मविश्वास वाढतो जो देहाभिमानाला खतपाणी घालतो.
वस्तूंबद्दल हवेपण वाढवतो. तात्पर्य, ‘अहं’ आणि ‘ममता’ हीच मोहाची मातापितरे आहेत. त्यांच्याच योगाने तो बळावतो आणि हा जनांना भूल घालतो. एखादे विष चाखायला गेले असता मधुर लागते त्याप्रमाणे आपल्याला प्रिय असलेल्या विषयांची आसक्ती धरतात आणि त्यांची अनेक प्रकारे सतत प्राप्ती झाली म्हणजे त्यालाच ‘सुख’ असे नाव देतात आणि विषयप्राप्ती झाली नाही की दुःखी होतात. उद्धवा शोक, मोह, सुख, दुःख या भावना देहाभिमानामुळे निर्माण होतात आणि त्या अनेक दुःखदायक देह धारण करायला लावतात. जो ज्याचा तीव्र ध्यास घेऊन मरण पावतो त्याच रूपाने पुनर्जन्म घेऊन येतो किंवा जो अतिशय द्वेषरूपानेच मरण पावतो म्हणून वैराच्याच स्वरूपाने जन्मास येऊन वैर चालू ठेवतो. उदाहरणार्थ सर्प आणि मुंगूस यांची पूर्वजन्मीची वृत्ती वैराचीच असते. मरणकाली जी जी वासना शिल्लक राहते, ती ती गतीच प्राण्याला प्राप्त होते. अंतःकरणामध्ये अंतकाली खरोखर जी प्रबळ वासना उत्पन्न होते त्या गतीला तो तो प्राणी जातो. हा सगळा मायेचाच चमत्कार आहे.
मायाच गुणाच्या कार्याला उत्पन्न करते आणि देहाचा भास करून देते. ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये मनुष्य निरनिराळय़ा घटना पाहतो तसेच या विश्वाचा भास ही मायेचीच निर्मिती आहे. पण विश्वाला खरंच अस्तित्व नाही. तेथे सुखदुःख कोठचे आणि काय? हे उद्ववा! विद्या आणि अविद्या या दोन्ही माझ्याच शक्ती आहेत त्या मनुष्यांना अनुक्रमे मोक्ष आणि बंधन प्राप्त करून देणाऱया आहेत या दोन्ही अनादी असून माझ्या मायेने रचलेल्या आहेत. जिचा आत्मज्ञानानेच प्रत्यय येतो. ‘अहंब्रह्मास्मि’ अशी निरंतर भावना राहते तीच ‘शुद्ध विद्या’ होय आणि तीच अविद्येचा नाश करणारी आहे असे समज. मी पापी, मी कपाळकरंटा अशीच जेथे निरंतर भावना स्फुरत असते ती ‘अविद्या’ होय आणि तीच अनेक प्रकारचे संशय उत्पन्न करते. एक जीवाला बंदीत घालते आणि एक जीवाचे बंधन तोडून टाकते. हे उद्धवा, या दोन्ही माझ्याच अनादि शक्ती होत.
क्रमशः